आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Wednesday 28 November 2012

भीमाशंकर अभयारण्य, पुणे.

                      भीमाशंकर अभयारण्य, पुणे.
 
               पुणे, ठाणे, रायगड अशा तीन जिल्ह्यात पसरलेले हे अभयारण्य १९८५ साली संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. १३० चौ. कि.मी. क्षेत्रावर पसरलेल्या या अभयारण्याचे प्रमुख क्षेत्र पुणे जिल्ह्यातील खेड व आंबेगाव या तालुक्यांत येते. समुद्रसपाटीपासून हे स्थान सुमारे २५०० फूट उंचीवर आहे.

१२ ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या महादेवाच्या पवित्र ठिकाणाजवळ हे जंगल आहे. भीमा व घोडनदी या नद्यांचा उगम येथूनच होतो. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधे असलेल्या दाट झाडीत अनेक वन्य जीवांसोबत कीटक, पक्षीही आढळतात. आदिवासी लोकही या ठिकाणी वास्तव्याला आहेत. प्रामुख्याने महादेव कोळी हे आदिवासी भीमाशंकरजवळ राहतात.

महाराष्ट्रात दुर्मीळ असलेली व महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेली उडणारी खार ‘शेकरू’ येथे आढळते. असंख्य जातीची फुलपाखरे, कीटक, तसेच अनेक पक्षीही बघायला येणारे निसर्गप्रेमी भीमाशंकरला येतात. नागफणी कडा, बॉंबे पॉईंट, हनुमान टँक व गुप्त भीमाशंकर आदी ठिकाणांचा आनंद या जंगलात येणारे पर्यटक घेतात.

आंबा, जांभूळ, बांबू, पळस, बाभूळ, अंजन, बेहेडा, बेल, हिवर, साग, सालई असे वृक्ष जंगलात आहेत. वनौषधी, गवत, नेचाही भरपूर प्रमाणात आहे. या अभयारण्यात हरीण, रानडुक्कर, बिबळ्या, माकड, तरस, सांबर हे वन्यजीव तसेच हॉर्नबील, गरुड इत्यादी प्राणी-पक्षी आढळतात.

उपरोक्त अभयारण्यांसह कर्नाळा पक्षी अभयारण्य (रायगड जिल्हा); रेहेकुरी काळवीट अभयारण्य (अहमदनगर जिल्हा); माळढोक अभयारण्य (अहमदनगर व सोलापूर जिल्हा); नांदूर - मधमेश्र्वर अभयारण्य (नाशिक जिल्हा); किनवट अभयारण्य (नांदेड व यवतमाळ जिल्हा); सागरेश्र्वर अभयारण्य (सांगली जिल्हा); बोर अभयारण्य (वर्धा जिल्हा); गवताळा अभयारण्य (औरंगाबाद जिल्हा) व चांदोली अभयारण्य (सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्हा) - आदी अभयारण्ये महाराष्ट्रात आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक या वनसंपत्तीचा तेथील पशू-पक्षांचा, प्रदूषणमुक्त हवेचा आनंद मनमुराद लुटत असतात.
ही अभयारण्ये आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वनखात्याची, पर्यटन खात्याची विश्रामगृहांची सोय आहे. काही ठिकाणी पर्यटन आणि वनखात्यानी तयार केलेली संग्रहालयेही आहेत. प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शक, माहिती पुस्तिकाही उपलब्ध करून दिली जाते.

वनखात्याने वन्यजीवांना सुरक्षितता मिळावी, त्यांची संख्या वाढावी, तसेच त्यांचा मानवाला व मानवाचा त्यांना उपद्रवही होऊ नये म्हणून त्यांना सुरक्षित क्षेत्र आखून दिले आहे. संबंधित नियम पाळून सरकारला साहाय्य केले जावे म्हणून जंगलात जाणार्‍यांसाठी नियमावलीही तयार केली आहे. पर्यटकांना, जंगल प्रेमींना, अभ्यासकांना उपयुक्त अशी माहिती सर्वत्र उपलब्ध आहे. त्यामुळे अभयारण्यांची घोषणा ही फारच उपयुक्त असल्याचे लक्षात येते. वृक्षतोडीला आळा घालण्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचीही जपणूक होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा असाही उद्देश साध्य होत आहे. जागरूक नागरिक म्हणून आपलेही सहकार्य व योगदान अपेक्षित आहेच!

No comments: