आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Friday 30 November 2012

लोककला-2

४. पोतराज
आलीया मरिबाई,
तिचा कळेना अनुभऊ
भल्या-भल्यांचा घेती जीवू,
आलीया मरिबाई.
वर्षभरात एकदातरी ढोलक्याचा तालबद्ध आवाज, त्यावर वाजणारी घुंगरं आणि आसुडाचे कडाडणारे फटके कानावर पडतातच. हा थोडासा उग‘, भयावह वाटणारा गोंधळ कानी आला की, गावातल्या आयाबाया हातात धान्याचं सूप किंवा खण-नारळ घेऊन लगबगीनं बाहेर येतात. मरिआईचं देणं चुकवलं की, भयंकर परिणामांना सामोरं जावं लागतं ही धारणा आजही तितकीच पक्की आहे. त्यामुळं पोतराज गावात आला की, महिला वर्ग न चुकता हळदी कुंकू वाहायला मरिआईच्या गाड्याभोवती जमा होतात. लहान मुलांना आजारातून बरं करण्यासाठी, जनावरांच्या रक्षणासाठी, घरात शांतता नांदण्यासाठी मरिआईला नवस बोलला जातो. ग्रामीण भागातल्या महिलांची या देवीवर गाढ श्रद्धा आहे. तिच्या सेवेत कमी पडल्यास, तिच्या देण्यात कसूर झाल्यास ती भक्ताला जीवघेणी शिक्षा देते, जीव घेण्यासही कमी करत नाही. एवढी ती कडक आहे असे मानले जाते. म्हणूनच तिला कडकलक्ष्मी असे संबोधले जाते. ती आपल्या भक्तांना नेहमी सुखात ठेवते, पण त्यासाठी पाळावयाची पथ्ये इतर देवी-देवतांच्या पथ्यांपेक्षा कडक आहेत.

मरिआई, कडकलक्ष्मी किंवा मरिबाई जेवढी कडक, उग्र आहे, तेवढाच तिचा भक्त पोतराजही कडक व उग‘ वाटतो. लांब वाढलेले, जटा झालेले केस, कपाळाला मळवट, चेहरा व त्वचा रापलेली, कमरेला विविध रंगांच्या कापडांचं बनविलेलं नेसणं (कमरेचं वस्त्र), त्यावर बांधलेली मोठ्या आकाराची घुंगरं, पायात चाळ आणि हातात आसूड असा त्याचा वेष असतो. त्याच्यासोबत असणारी बाई डोक्यावर मरिआईचा गाडा घेऊन हाताने ढोलकं वाजवीत असते. ढोलक्याच्या एका बाजूने विशिष्ट प्रकारचा, सलग ध्वनी निर्माण करत दुसर्‍या बाजूला ठेका वाजवला जातो. तो वैशिष्ट्यपूर्ण ध्वनी मनात वेगळंच, गूढ वातावरण तयार करतो. या तालावर नाचणारा पोतराज पायातल्या घुंगरांनी वातावरण भारून टाकतो आणि हातातल्या आसुडाने स्वत:वर फटक्यांचा वर्षाव करून मरिआईच्या कडक स्वभावाला साजेसा भक्तीचा आविष्कार दाखवत राहतो. खिळ्याने स्वत:ला जखमी करून घेणे, स्वत:चे मनगट जोरात चावणे असे आत्मक्लेश तो मरिआईच्या कृपेने सहज करतो अशी धारणा आहे.

मरिआई त्याच्या अंगात आल्यानंतर ती भक्तांच्या अडीअडचणींवर उपाय सांगते. एकेक बाई पुढं येऊन आजारी पडणार्‍या जनावरापासून ते लग्नापर्यंत सर्व प्रकारच्या शंका देवीला सांगते. त्यावर देवी उपाय सांगते व हे काम झाल्यास पुढच्या वेळी मी खणा-नारळाने ओटी भरीन असा नवस बोलते. तो नवस फेडण्यासाठी किंवा देवीला तक्रार सांगण्यासाठी पुढच्या वर्षापर्यंत पोतराजाची वाट पाहत राहते. एकूणच पोतराज ही न संपणारी व सातत्याने चालत राहणारी सामाजिक कि‘या बनली आहे. मरिआईच्या गाड्यासमोर बोललेला नवस सहसा मंदिरात जाऊन फेडला जात नाही. त्यासाठी वर्षभर थांबून पोतराज येण्याचीच वाट पाहिली जाते. मरिआई देवी कुटुंबाच्या कल्याणासाठी, रक्षणासाठी सदैव जागृत असणार्‍या भाबड्या गृहिणींची ‘कल्याणकर्ती’ आहे आणि पोतराज देवी आणि भक्त या दोघांमधला दुवा आहे. ‘दार उघड बया दार उघड’ म्हणत तो मरिआईला भक्ताच्या भेटीला घेऊन येतो. मरिआई ही मूळची दक्षिणेची; द्रविडांच्या ग्रामदेवींपैकी एक आहे. दक्षिणेत तिला मरिअम्मा या नावाने संबोधले जाते. महाराष्ट्रात तिचे मंदिर गाववेशीवर असते.

पोतराज या मराठी शब्दाचा मूळ द्रविड शब्द ‘पोत्तुराजु’ असा आहे. ‘पोत्तु’ म्हणजे रेडा किंवा बकरा. दक्षिणेत अशा प्राण्यांचा बळी देवीला प्रसन्न करण्यासाठी दिला जात असे. असा बळी देण्याचे काम करणारा जो, तो पोत्तुराजु म्हणजेच मराठीत पोतराज होय.

एकूणच पोतराज ही परंपरा पूर्णत: दैवी शक्तीच्या भीतीतून निर्माण झाली आहे व ती भीती आजही इतकी खोलवर आहे की, ही परंपरा शतकानुशतके कमी प्रमाणात का होईना पण अशीच सुरू राहील, असे मत अभ्यासक व्यक्त करतात. ग्रामीण भागातील लोकांच्या श्रद्धेला आधार देणारा हा पोतराज आता विरळ होत चालला आहे. पहिल्यासारखा तो भयावह प्रकार करत नाही. लोकांनाही आता तेवढी भीती वाटत नाही.

पण किती ठरवलं, तरी त्याच्या आसुडाचा आवाज अंगावर शहारे आणतोच आणतो. वृद्ध स्त्रियांची लगबग पाहिली की, मरिआईचा महिमा किंवा दहशत आणि पोतराजाचा प्रभाव या दोन्हींचा अंदाज येतो. डोक्यावर गाडा आणि गळ्यात ढोलकं घेऊन पोटासाठी मूठ-पसा मागणार्‍या त्या मरिआईच्या भक्तमाऊलीला व पोतराजाला मरिआई सौ‘य, समाधान आणि निरोगी जीवन देवो, ही प्रार्थना!
५. भुत्या
भवानी, मी तुझा भुत्या खरा।।धृ।।
अनुहात -चौंडके वाजत डुगडुग।
होतो घोष बरा।।१।।
बोधाची परडी, ज्ञानाचा संबळ।
अज्ञान तो पोत खरा।।२।।
एका जनार्दनी भुत्या मी जालों।
तुझे पायी मी खरा।।३।।
संत एकनाथांच्या या अभंगातून भुत्याची श्री जगदंबेवरची श्रद्धा किती गाढ आहे हे दिसून येते. भुत्यासाठी रेणुका माता आणि भवानी माता एकच आहे. या दोन्ही देवीत तो कोणताही भेद मानत नाही.

अंगात झगा, पायात विजार, डोक्यावर कवड्या गुंफलेली टोपी, गळ्यात कवड्यांची माळ आणि कमरेला कवड्यांचा पट्टा घातलेल्या भुत्याच्या एका हातात चिंध्यांनी बनविलेला मोठा पोत आणि दुसर्‍या हातात तुणतुणे असते. डाव्या खांद्यावरून बुधळी लोंबत असते, तर उजव्या खांद्याला झोळी असते. गळ्यात देवीचा टाक असतो. अनवाणी, मळकट कपड्यातला, कवड्यांनी सजलेला भुत्या मुखाने सदैव देवीच्या आरत्या, गीतं गात असतो, तर कधी आग‘ह केल्यास तो कथाही सांगतो.
घटस्थापनेच्या (नवरात्राच्या) कालावधीत हे भुत्ये गावोगाव फिरून देवीचा महिमा गातात. लोक या उपासकाच्या पोतावर तेल टाकतात आणि घटात टाकलेली दक्षिणाही त्याला देतात. हे भुत्ये सहसा मराठा किंवा ब्राह्मण जातीतील असतात. भुत्या होण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा विधी पार पाडावा लागतो. हा विधी भोपे पार पाडतात. या देवीभक्तांमध्ये भुत्या म्हणजे सेवक आणि भोपे म्हणजे राजे होत.

भुत्या होण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अखंड ब‘ह्मचारी राहून भुत्या होता येते आणि फक्त ठरावीक दिवशी जोगवा मागणारा व इतर दिवशी सर्वसामान्य जीवन जगणारा भुत्याही होता येते. बहुतांश लोक स्वखुशीने भुत्या होतात. स्वत: छत्रपती शिवाजी महाराज स्वत:ला देवीचा भक्त व सेवक समजत व कवड्यांची माळ धारण करीत असंत, असे उल्लेख इतिहासात आढळतात. भुत्याच्या या संपन्न परंपरेने मराठी साम्राज्यावर अनंत उपकार केले आहेत. शिवरायांच्या सैन्यातील हेरांनी भुत्याचा वेष घेऊन हेरगिरी केली आणि स्वराज्यस्थापनेत मोलाचा वाटा उचलला.
असा सामाजिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही भुत्या आदर्श आहे. भविष्यकाळात महाराष्ट्राच्या कुलदेवीचा हा भक्त तुणतुण्याच्या तालावर अंबेचे गोडवे गात राहायला हवा व प्रबोधनपर कथा-गीतांनी लोकजीवनाची गंगा अधिकाधिक पवित्र व्हायलाच हवी. ही संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे.

 
 
६. भराडी
कर्म वाईऽऽट,
वैतागी बांधला मठ
अशी डमरूच्या तालावर प्रबोधनाची वाणी फुलून येताना ज्यांनी सातत्याने पाहिली असेल, त्यांना भराडातल्या मार्मिकतेची जाणीव नक्कीच झाली असेल. ग्रामीण जीवनातील अनेक प्रश्नांना आपल्या गीतांमधून वाचा फोडणारा हा लोककलाकार आज खूपच विरळ झालेला आहे. आजच्या पिढीतल्या, विशेषत: ग्रामीण भागातील लोकांनाही भराडी कितपत माहिती आहे याबद्दल साशंकता आहे. एखादा कोणी पाल्हाळीक बोलत असेल तर म्हातारी माणसं ‘बंद कर तुझं भराड’ असं म्हणतात. त्यावरून भराड म्हणजे पाल्हाळ एवढाच अर्थ मनात येतो. पण ‘भराड’ हाही एक लोककलेचा प्रकार आहे, ही माहिती खूप कमी जणांना आहे. वासुदेव, पिंगळा, पोतराज, भुत्या, लावणी, शाहिरी, कीर्तन या कला आजही थोड्याबहूत फरकाने अधूनमधून का होईना पाहायला मिळतात. पण भराड ऐकायला मिळणे आजच्या घडीला किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी दूरापास्तच आहे.
भैरवोपासक : भराडी हे श्री भैरवनाथाचे उपासक आहेत. नाथपंथाची दीक्षा घेऊन ते भैरवनाथाचे गुणगान करत भराड सांगत फिरतात. पूर्वी ते धोतरावरून नेसले जाणारे काचे बनवून उदरनिर्वाह करत. भराड्यांना डबरे गोसावी असेही संबोधले जाते.

वयाच्या दहाव्या ते बाराव्या वर्षी या समाजातील मुलांना दीक्षा दिली जाते. नाथपंथाची ही दीक्षा देण्याचा विशिष्ट विधी असतो. तो पूर्ण करण्यासाठी भराड्यांच्या साडेतीन गाद्यांपैकी कोणत्याही एका गादीचे गुरू किंवा समाजातील श्रेष्ठ व्यक्ती येते. या विधीला मुद्रा घालण्याचा विधी असेही म्हणतात. या वेळी विविध मंत्र म्हणून हा विधी पार पाडला जातो.

कंचन काया कफनी लाया,
निर्गुण सगुण चिरा दिया,
उन्मनि मुद्रा कान धराया,
शैली शृंगी सत्यजोगका माया,
ॐ नमो गुरुको आदेश आदेश आदेश।।

असे मंत्र म्हणून नंतर मुलाच्या कानात बाली घातली जाते.
भैरवनाथाची उपासना करणार्‍या या समाजाच्या धार्मिक व सामाजिक जाणिवेचा आढावा घेतल्यास आपल्या भराडांमधून त्यानी मांडलेले मार्मिक प्रश्न आपल्याला अंतर्मुख करून जातात. शेतकर्‍यांची दयनीय अवस्था कथन करण्यासाठी ते शंकर-पार्वती या दोघांमधल्या संवादाचा आधार घेतात.

शंकरासी पुसे पार्वती, कुणबी भुमिचा अधिकारी,
असे असता का हो शंकरा, सदा गरीबी कुणब्याच्या घरी?
हा प्रश्र्न खरंतर महाराष्ट्रातल्या कृषी जीवनाशी निगडीत असलेल्या प्रत्येकाला पडला आहे. पण याचं उत्तर देताना भराडी लोकसेवा, दानधर्माचा विसर या गोष्टींना कारणीभूत ठरवतो. त्याच्या कथा-गीतांत तो पुढे शंकर-पार्वतीला शेतकर्‍याकडे घेऊन जातो. भिकार्‍याच्या वेशात जाऊन शंकर शेतकर्‍याला दान मागतो, तर शेतकरी त्याचा अपमान करतो, त्याला बांधून ठेवतो. हे पाहून रागावलेली पार्वती शेतकर्‍याला शाप देते.

‘अस्सल माल दे जा उदम्याला
तू खा कोंडा मातेरं,
पार्वती म्हणे ऐक कुणब्या
दानधर्म हातानं कर रं’
असे अनेक मार्मिक प्रश्न मांडत भराड रंगत जाते. नवरात्राच्या काळात भैरवनाथाच्या मंदिरात नऊ दिवस हे भराड चालते. भराड्यांनी पूज्य मानलेल्या साडेतीन गाद्यांच्या ठिकाणी - म्हणजे काशी, सोनारी, रत्नागिरी आणि अर्धी गादी असलेल्या पारुंडे या ठिकाणी- भैरवनाथाच्या उत्सवात भराड ऐकण्याची पर्वणी असते.

भराड्यांनी तमाशा या लोककलेतही आपला ठसा उमटविलेला आहे. त्यांचे स्वत:चे तमाशाचे फडही आहेत. अशा इतर कामांसोबत विष उतरविण्याचे कामही ते करतात. साप चावलेल्या माणसाला श्री भैरवनाथाच्या मंदिरात आणून भराडी एक कथा सांगतो. ही कथा जसजशी संपते, तसे विष उतरत जाते अशी समजूत आहे.

भराडाची रचना गोंधळाप्रमाणेच असते. प्रथम गण, देवतांना आवाहन, त्यानंतर भैरवनाथाची स्तुती, कथा व शेवटी आरती करून भराडाची सांगता होते.

समाजजीवनाचे पावित्र्य जपण्यासाठी व आध्यात्मिक उन्नतीसाठी, लोकांच्या दोषांवर अचूक बोट ठेवण्याची कला या लोककलावंतानी जपली त्यामुळेच ग्रामीण भागात नीतीमूल्यांची इमारत अजूनही खंबीर आहे. भैरवनाथाची कृपा त्याच्यावर आहे याबद्दल तो निश्र्चिंत आहे. देवाविषयी सांगताना तो म्हणतो - ‘देव बहिरी , भक्तांचा कैवारी’
बहिरी ससाण्याप्रमाणे देवाची भक्तांवर व खुद्द भराड्यांवर नजर आहे. त्याच्या प्रत्येक गाण्यानंतर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याला वंदन करण्यासाठी आपणही म्हणू या - ‘भैरवनाथाच्या नावान ऽऽऽ चांगभलं’’.



७. वाघ्या- मुरळी
महाराष्ट्राच्या आदर्श परंपरेत भर घालणार्‍या अनेक लोककला जनजीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. पण या कलांमध्ये जेव्हा अंधश्रद्धेतून मानवी जीवनावर होणारा अन्याय डोकावतो, तेव्हा भारावून सोडणार्‍या काही कलांच्या मुळाशी असणारा अन्यायकारक विचार मनाला टोचू लागतो. ‘वाघ्या-मुरळी’ हे लोककलावंत मनात असेच प्रश्नांचा डोंगर उभा करतात.

वाघ्या आणि मुरळी ही जोडी खंडोबाची उपासना करण्यासाठी आयुष्य वेचते. नवलाख पायरीच्या वर असणार्‍या या जेजुरीच्या खंडोबाचं गुणगान गावोगावी घरोघरी भक्तिभावानं केलं जातं आणि याच भक्तीचा एक भाग म्हणून वाघ्या-मुरळीला बोलावून देवाचं जागरण घातलं जातं. महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्वच खेड्यांमध्ये हा कुळाचार पाळला जातो.
वाघ्या मुरळीचा जन्म -
लग्नानंतर लवकर अपत्य होत नसल्यास आई-वडील खंडोबाला अशी प्रार्थना करतात की, आम्हाला मूल झाल्यास पहिलं मूल आम्ही तुझ्या भक्तीसाठी अर्पण करू. हा नवस बोलून जर त्यांना मूल झालं, तर ते पहिलं मूल ते विधिवत देवाला सोडतात. (वास्तविक नवसाने मूल होत नाही आणि काही कारणानं मूल झालं, तरी आपल्या वांझपणाचा कलंक पुसण्यासाठी कोवळ्या जीवाच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही.)

देवाला सोडलेला मुलगा वाघ्या होतो आणि मुलगी मुरळी होते.

वाघ्या किंवा मुरळी सोडण्याचा एक ठरावीक विधी असतो. नवस बोलणारे आई-वडील चैत्र महिन्यात नवस पूर्ण करण्याचा मनोदय विशिष्ट अशा देवस्थानाच्या गुरवाला (पुजार्‍याला) कळवतात. त्यानंतर एक तारीख व वेळ नक्की केली जाते, त्या दिवशी मुलाला / मुलीला वाजत-गाजत देवळात आणले जाते. खंडोबाच्या साक्षीने मुलाच्या गळ्यात वाघाच्या कातड्याची भंडार्‍याची पिशवी अडकविली जाते व देवाला त्या मुलाचा स्वीकार करण्यासाठी साकडं घातलं जातं. देव त्या मुलाचा स्वीकार करतो हे गुरवालाच कळते व त्यानंतर ते मूल आयुष्यभरासाठी खंडोबाच्या मालकीचं होतं. पण, दुर्दैवाने वास्तवात खंडोबाच्या या भक्तांवर धनदांडग्यांचीच मालकी राहते.

खांद्यावर घोंगडं, गळ्यात वाघाच्या कातड्याची पिशवी आणि हातात घंट्यांची जोडी म्हणजेच घोळ असलेला वाघ्या रुबाबदार वाटतो. तर नऊवारी नेसून खंडोबाच्या नावाचा भंडारा कपाळावर लावणार्‍या मुरळीची चपळाई कार्यक‘मात रंगत भरते. वाघ्या-मुरळीची जागरणं शुभकार्यानंतर घरोघरी आयोजित केली जातात. हे कार्यक‘म अगदी गोंधळासारखेच असतात. गोंधळात स्त्रिया नसतात आणि इथे मुरळी (स्त्री) असते हा एक महत्त्वाचा फरक आहे.

वाघ्यांचे दोन प्रकार आहेत एक घरवाघ्या आणि दुसरा दारवाघ्या. घरवाघ्या म्हणजे खंडोबाचा नवस फेडण्यासाठी काही ठरावीक दिवशी वाघ्याचा वेश धारण करून पाच घरी जाऊन वारी मागणारे, आणि दारवाघ्या म्हणजे कायमस्वरूपी वाघ्या होण्याची दीक्षा घेतलेले.

‘वाघ्या’ या पात्राविषयी आणि त्याच्या नावाविषयी अभ्यासकांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत.
मुरळी तर प्रथमपासूनच टीकेचं लक्ष झाली आहे. अगदी संत एकनाथांनीही -
‘इच्छामुरळीस पाहूं नका, पडाल नरकद्वारी।।’
असा उपदेश केला आहे. म्हणजेच मुरळी हे मायाजालाचं प्रतीक म्हणून संबोधली गेली आहे.
संत शेख महंमद बाबा तर कोणताही आडपडदा न ठेवता पुढील काव्यातून आपले मत व्यक्त करतात.
‘पुण्य आचरण न ये मुरळीच्या चित्ता। भलत्याच्या होतील कांता।
त्यांचा हात भाळास लावितां। कोण तरला सांग बा।।’
मुळात मुरळी हे पात्रच असं आहे. तिच्या भक्तीची जातकुळी आणि तिचं देवाशी असणारं नातंच असं आहे की ऐकणार्‍याला व बघणार्‍याला ते विचित्र वाटावं. तिच्या भक्तीतली ओढ आणि तिची भूमिका मांडणारं हे गीत तिला अधिक स्पष्ट करतं -
वय सोळा, कोवळी काया, हूडपणात घुंगरु पाया,
लागे नाचाया, लागे नाचाया, लागे नाचाया,
पोर बावरी झाली पहा, जेजुरीला जाया।।
नव्या नव्या वार्‍याने, हिचे भारावले अंग,
या अशा वयांतच बदलू पाहे ढंग,
उतावीळ मल्हारीसंगे लगीन लावाया।।
एकूणच थोडीशी वेगळ्या धाटणीची वाटणारी ही भक्ती महाराष्ट्राच्या लोकजीवनातील चैतन्य होऊन राहिली आहे. हे चैतन्य काही अन्यायी विचारांच्या पायावर उभे आहे हे दुर्दैव! पण त्यातही सुधारणा होते आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रामुख्याने मुरळींबाबतच्या समस्या प्रथम समाजासमोर मांडल्या. सरकारने मुरळी होण्यावर बंदी घातली आहे. तुणतुणं, खंजिरी आणि घोळाच्या तालावर
मुख दाऊन बानू गेली ।
स्वारी देवाची ग वेडी झाली जी ।।

हा खंडोबाचा जागर ऐकत, कलेच्या निकोप दृष्टीने आपण ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ म्हणत वाघ्या-मुरळीच्या गीतांना साद नक्कीच देऊ शकतो.

No comments: