आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Monday 6 January 2014

सातारा जिल्हा

            सातारा जिल्हा- भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे विभागातील एक जिल्हा आहे.सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतात सुद्धा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

चतुःसीमा

सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात येतो. सातारा जिल्ह्याच्या
पूर्वेस - सोलापूर जिल्हा,
पश्चिमेस - रत्नागिरी जिल्हा,
उत्तर-पश्चिमेस- रायगड जिल्हा,
उत्तरेस- पुणे जिल्हा व
दक्षिणेस- सांगली जिल्हा आहेत. सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस असणारी सह्याद्री पर्वताची रांग त्याला कोंकणापासून अलग करते.
तालुके
सातारा जिल्हयाचा नकाशा
सातारा
कराड
वाई
महाबळेश्वर
फलटण
माण
खटाव
कोरेगांव
पाटण
जावळी
खंडाळा
विशेष

‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असे सांगणाऱ्या समर्थ रामदासांच्या अस्तित्वाने पावन झालेला व त्यांची समाधी असलेला आणि छत्रपतींच्या गादीचे स्थान असलेला सातारा जिल्हा. महाबळेश्र्वरसारखे निसर्गरम्य ठिकाण असलेला, तसेच सुंदर कृष्णाकाठ लाभलेला आणि शिक्षणाची गंगोत्री असलेला हा जिल्हा. या जिल्ह्याने देशासाठी सर्वांत जास्त (संख्येने) बलिदान दिले असल्यामुळे याला शहीद सैनिकांचा जिल्हा असेही म्हणावे लागेल. या जिल्ह्यातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या शैक्षणिक कार्यास सुरुवात केली आणि महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडवली. याच जिल्ह्याने यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने (संयुक्त) महाराष्ट्राला पहिले मुख्यमंत्री दिले. यशवंतराव यांनी केवळ सातारा जिल्ह्याचाच नव्हे, तर महाराष्ट्राचा विकास साधला; केंद्रीय पातळीवरही परिपक्व नेते म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
ऐतिहासिक महत्त्वाचे
चालुक्य राजवटीपासून मराठेशाही पर्यंत प्रवास-

सातारा जिल्हा व परिसरात पूर्वी चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादवी, बहामनी व आदिलशाही या राजवटींनी राज्य केले. कोल्हापूर व सातारा परिसराचा इतिहास प्रामुख्याने मराठेशाहीशी जोडलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम यांनी १६९८ मध्ये साताऱ्याला छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. ही गादी थोरली पाती म्हणून ओळखली जाते. १७०८ मध्ये संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांचा राज्याभिषेक सातारा गादीवर झाला होता. पुढे काही काळ मराठेशाहीत दुर्दैवी संघर्ष चालू होता, परंतु वारणा नदीकाठी संभाजी महाराजांचे पुत्र शाहू व राजारामांचे पुत्र दुसरा संभाजी यांचेमध्ये (१७३१) तह झाला, आणि कोल्हापूर व सातारा या सिंहासनांमधील दुही संपली. छत्रपती शाहू महाराज अनेक वर्षे साताऱ्याच्या गादीवर विराजमान होते.

शिवकालीन इतिहासातही साताऱ्याचे स्थान महत्त्वाचे होते. समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट जेथे झाली ते ठिकाण चाफळ(तालुका पाटण) याच जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील प्रतापगडावर शिवरायांनी अफझलखानाचा शिताफीने वध केला. ही घटना छत्रपतींच्या मुत्सद्देगिरीची, शौर्याची व गनिमी कावा तंत्राची साक्ष देणारी घटना होय.
स्वांतत्र्य संग्रांमात सहभाग-

शिवशाहीच्या काळापासून या जिल्ह्याला लष्कराची -जिल्ह्यातील तरुणांना सैनिक होण्याची- ओढ आहे. स्वातंत्र्यानंतरही लष्करात सामील होणाऱ्या तरुणांचे प्रमाण या जिल्ह्यात सर्वांत जास्त आहे. तसेच आत्तापर्यंतच्या अनेक युद्धांत शहीद झालेल्या सैनिकांची संख्या पाहता हाच जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक चळवळींत क्रांतिसिंह नाना पाटील यांनी या जिल्ह्याचे नेतृत्व केले. श्री.नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातला पण त्यांनी कार्य केले प्रामुख्याने सातारा जिल्ह्यात. १९४३ ते १९४६ या काळात त्यांनी सातारा भागात सुमारे १५० गावांमध्ये प्रति -सरकार स्थापन केले होते. स्वातंत्र्यानंतर श्री. पाटील यांनी लोकसभेतही साताऱ्याचे प्रतिनिधित्व केले. १९५७ च्या सुमारास त्यांनी संसदेत मराठीतून भाषण केले होते.
भूगोल

सातारा जिल्ह्याच्या उत्तरेला पुणे जिल्हा असून; पूर्वेला सोलापूर, दक्षिण व आग्नेयेला सांगली, पश्र्चिमेला रत्नागिरी व वायव्येस रायगड जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेला सह्याद्रीच्या रांगा व कोयना प्रकल्पाचा जलाशय असून जिल्ह्याच्या उत्तरेकडील सीमेवर नीरा नदी आहे. जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिम भागात सह्याद्रीचे डोंगर असल्याने येथे हवामान थंड व आल्हाददायक असते. पावसाचे प्रमाण विषम असून, पश्र्चिमेकडील डोंगराळ भागात, महाबळेश्वर भागात पाऊस जास्त पडतो, तर पूर्वेकडील खटाव, माण या तालुक्यांत तो अतिशय कमी पडतो.
लोकसंख्या - (संदर्भ - जनगणना २००१)क्र तपशील संख्या
१ क्षेत्रफळ १०,४८०.० चौ. कि. मी.
२ लोकसंख्या एकूण २८,०८,९९४
१.पुरुष १४,०८,३२६
२.स्त्रिया १४,००,६६८
३. ग्रामीण २४,१०,८७३
४.शहरी ३,९८,१२१
३ स्त्री- पुरुष गुणोत्तर १०००:९९५
४ साक्षरता एकूण ७८.२२ %
१.पुरुष ८८.२० %
२.स्त्री ६८.३८ %

नद्या-

कृष्णा, कोयना, नीरा, वेण्णा, उरमोडी, तारळा, माणगंगा या जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्या आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील क्षेत्र महाबळेश्वर येथून कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या पाच नद्यांचा उगम झालेला आहे. जिल्ह्यातील नद्या प्रामुख्याने सह्याद्रीत उगम पावून पूर्व व दक्षिणेकडे वाहणाऱ्या आहेत. कृष्णा या प्रमुख नदीचा जिल्ह्यातील प्रवाह सुमारे १६० कि.मी. लांबीचा आहे. जिल्ह्यातील कर्‍हाड येथे कृष्णा व कोयना नद्यांचा संगम झालेला आहे.
विविध प्रकल्प

जलविद्युत प्रकल्प-

कोयना नदीवरील पाटण तालुक्यातील प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणावर जलविद्युत निर्माण केली जाते. हा राज्यातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे. राज्यात सर्वांत जास्त जलविद्युत निर्मिती (सुमारे १००० मेगावॅट) सातारा जिल्ह्यात केली जाते. कोयना, धोम, कन्हेर ही येथील प्रमुख जलविद्यूत निर्मिती केंद्रे आहेत. कोयना प्रकल्पात लेक टॅपिंगचा प्रयोगही यशस्वी करण्यात आलेला आहे.

धरण-

पाटण तालुक्यातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास शिवाजीसागर असे म्हटले जाते. राज्यातील या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पासह कृष्णा नदीवरील धोम येथील धरण, वेण्णा नदीवरील कन्हेर येथील धरण व नीरा नदीवरील वीर येथील धरण हे महत्त्वाचे प्रकल्प जिल्ह्यात आहेत.

पवनऊर्जा प्रकल्प -

जिल्ह्यातील वनकुसवडे पठारावर महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी या शासनाच्या संस्थेच्या वतीने पवनउर्जा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा प्रकल्प मानला जातो. सर्वात जास्त पवनचक्क्या सातारा जिल्ह्यातच आहेत. वनकुसवडेसह ठोसेघर, चाळकेवाडी, माळेवाडी येथे पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत. साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर दूरदर्शन व आकाशवाणी केंद्रे आहेत.

अभयारण्य-

जिल्ह्याच्या पश्र्चिम भागातील महाबळेश्र्वर, पाटण, वाई व जावळी या डोंगराळ भागात तुलनेने दाट वने आहेत. कोयना नदीच्या खोऱ्यात पाटण, जावळी या भागांत कोयना अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. हे वन्यजीव अभयारण्य असून येथे वाघ, रानडुक्कर, सांबर, गवा हे प्राणी हमखास आढळतात. जिल्ह्यातील मायणी तलावाच्या परिसरात पक्ष्यांसाठी राखीव असलेले अभयारण्य विकसित करण्यात आलेले आहे. चांदोली (जि. सांगली, ता. बत्तीस शिराळा) हे धरण वारणा नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य हे येते. या अभयारण्यात सातारा जिल्ह्यातील ३ गावांचा (कर्‍हाड परिसरातील) समावेश होतो.
प्रशासन
तालुक्यांची लोकसंख्या व क्षेत्रफळ : (संदर्भ जनगणना २००१)

सातारा जिल्ह्यातील एकूण ११ तालुके असून त्यांची सूची पुढीलप्रमाणे आहे.क्र तालुका क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) लोकसंख्या
१ महाबळेश्वर ३७८.९ ५४,५४६
२ वाई ६२२.६ १,८९,३३६
३ खंडाळा ६००.२ १,१९,८१९
४ फलटण १,१७९.६ ३,१३,६२७
५ माण १,६०८.२ १,९९,५९८
६ खटाव १,३७४.० २,६०,९५१
७ कोरेगाव ९५७.९ २,५३,१२८
८ सातारा ९५३.५ ४,५१,८७०
९ जावळी ८६९.० १,२४,६००
१० पाटण १,४०७.८ २,९८,०९५
११ कर्‍हाड १,०८४.८ ५,४३,४२४

जिल्ह्यातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती पुढे दिली आहे.क्र तपशील संख्या नावे
१ नगरपालिका ०९ सातारा, कर्‍हाड, फलटण, रहिमतपूर, म्हसवड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, मलकापूर
२ जिल्हा परिषद ०१ सातारा
३ पंचायत समित्या ११ सातारा, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, कर्‍हाड, पाटण, कोरेगाव, माण, खटाव, फलटण, जावळी
४ ग्रामपंचायती १४८३ ---------------------

राजकीय संरचना
लोकसभा मतदारसंघ -

जिल्ह्यात सातारा हा १ लोकसभा मतदारसंघ आहे.
विधानसभा मतदारसंघ-

जिल्ह्यात ८ विधानसभा मतदारसंघ आहेत.

वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, सातारा, फलटण व माण.
सुचना-

फलटण व माण हे विधानसभा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत.
जिल्ह्यात ६७ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १३४ पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
शेती

वाई, सातारा, कर्‍हाड, पाटण व जावळी या प्रामुख्याने कृष्णेच्या खोऱ्यातील भागांत जास्त सुपीक जमीन आढळते. सातारा जिल्हा हा प्रामुख्याने कृषिप्रधान जिल्हा आहे. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हे दोन्ही हंगामात घेतले जाते. येथील खरीप हंगामातील जोंधळा ज्वारी व रब्बी हंगामातील शाळू ज्वारी प्रसिद्ध आहे. कृष्णाकाठची वांगी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. माण, खटाव, फलटण या कमी पावसाच्या प्रदेशात प्रामुख्याने बाजरीचे पीक घेतले जाते. जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्याही लक्षणीय असल्याने येथे उसाचेही उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
संशोधन केंद्र-

देशातील पहिले आले संशोधन केंद्र सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे केंद्रीय कृषी खात्याने स्थापन केले आहे. तसेच पाचगणी येथे रेशीम संशोधन केंद्र स्थापण्यात आले आहे.
लागवडीखालील क्षेत्र -क्र तपशील क्षेत्र (हेक्टर)
१ निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ५,५४,०००
२ जिरायत क्षेत्र ३,७५,०००
३ बागायत क्षेत्र १,७६,५००



हंगामनिहाय पिकांचा तपशील-क्र हंगाम प्रमुख पिके
१ खरीप तांदूळ, बाजरी, भुईमूग
२ रब्बी गहू, हरभरा
३ खरीप व रब्बी ज्वारी व उस

उद्योग

जिल्ह्यात सातारा, कर्‍हाड, वाई, मायणी व कोरेगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत.
सातारा तालुक्यातील जरंडेश्र्वर येथील भारत फोर्जचा लोखंडी सामग्रीचा कारखाना आहे.;
साताऱ्यातील बजाज समूहाचा स्कूटर निर्मितीचा कारखाना आहे.;
शिरोळे येथील कागद गिरण्या हे जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योग आहेत.
महाबळेश्र्वर येथे मधुमक्षिका पालन केंद्र असून येथील शुद्ध मध प्रसिद्ध आहे.
जिल्ह्यातील खटाव, माण व फलटण या तालुक्यांमध्ये घोंगड्या विणण्याचा वैशिष्ट्यपूर्ण उद्योग केला जातो.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांची सूची -

खालील सर्व सहकारी साखर कारखाने आहेत.क्र नाव गाव,तालुका
१ किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज,वाई
२ श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण
३ बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर, पाटण
४ कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे बुद्रुक, कराड
५ सह्याद्री सहकारी साखर कारखाना यशवंतनगर, कराड
६ अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना शाहूनगर, सातारा
७ जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखाना चिमणगाव, कोरेगाव


रयत सहकारी साखर कारखाना शेवाळे वाडी ता. कराड
खाजगी साखर कारखाने-

न्यू फलटण इंडस्ट्रीज या उद्योग समूहाने फलटण तालुक्यात साखरवाडी येथे खाजगी क्षेत्रातील साखर कारखाना उभारला आहे.
दळणवळण

मुंबई-ठाणे-पुणे-बंगळूरू-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ४) जिल्ह्यातील शिरवळ, खंडाळा, सातारा, उंब्रज व कर्‍हाड या प्रमुख ठिकाणांवरून जातो. तसेच पुणे-बंगळुरू हा लोहमार्ग जिल्ह्यातून गेला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाट; सातारा-रत्नागिरी रस्त्यावरील कुंभार्ली घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट असून, वाई-महाबळेश्र्वर रस्त्यावरील पसरणी घाट व महाबळेश्र्वर - महाड मार्गावरील पार घाट हे घाटदेखील निसर्गसुंदर व उपयुक्त आहेत.
साताऱ्याचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरापासूनचे अंदाजे अंतर पुढिलप्रमाणे आहे.क्र ...पासून अंतर(कि.मी.)
१ मुंबई २७२
२ नागपूर ७६९
३ औरंगाबाद ३३८
४ रत्नागिरी २४२
५ पुणे ११२

सैनिकी शाळा

सातारा येथे भारतातील सर्वांत जुनी व पहिली सैनिकी शाळा सुरू झाली.ही मुलांसाठि आहे.तसेच इतर रयत शिक्षण संस्थेच्या पण शाळा आहेत..
पर्यटन
सज्जनगड/समर्थ रामदास स्थापीत मारूती-

महाराष्ट्राभिमान जागवणाऱ्या, छत्रपती शिवाजी राजांच्या हिंदवी स्वराज्यास अनुकूल पार्श्र्वभूमी तयार करणाऱ्या समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य बराच काळ सातारा जिल्ह्यात होते. साताऱ्याजवळील सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. गडावर समर्थ रामदासांनी स्थापन केलेले श्रीराम मंदिरही आहे. रामदासी पंथाचे महाराष्ट्रातील हे एक प्रमुख केंद्र आहे. पाटण तालुक्यातील चाफळ या गावीही समर्थांनी श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी दोन मारुतींची मंदिरे येथेच आहेत. याच मंदिराच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची भेट झाल्याचे मानले जाते.
प्रतापगड-

प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल असा प्रतापगडाशी जोडलेला इतिहास सर्वज्ञात आहेच. प्रतापगड महाबळेश्वर तालुक्यात असून शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी अफझलखानाची कबर येथे आहे.
शिखर शिंगणापूर-

शिखर शिंगणापूर हे स्थान जिल्ह्यातील माण तालुक्यात आहे. शंभू-महादेवाचे येथील मंदिर राज्यात प्रसिद्ध असून, हे एक जागृत देवस्थान मानले जाते.
औंध संस्थान-

खटाव तालुक्यातील औंध हे पूर्वीचे संस्थान. संस्थानी वातावरणाच्या खुणा आजही येथे दिसतात. येथील वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध असून, येथील डोंगरावर यमाई देवीचे मंदिर आहे. यमाई देवी ही राज्यातील अनेकांची कुलदेवता आहे.
गोंदवलेकर महाराज-

माण तालुक्यातील गोंदवले येथे थोर श्रीरामभक्त गोंदवलेकर महाराजांची समाधी आहे. यांनीच महाराष्ट्रात ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या तेरा अक्षरी मंत्राचा प्रसार केला.
मांढरदेव-काळुबाई यात्रा-

वाई तालुक्यातील मांढरदेव हे गाव प्रसिद्ध असून येथे काळूबाईची मोठी यात्रा भरते. येथे हिंदू-मुस्लीम धर्मांचे भाविक गर्दी करतात.
श्री.भैरवनाथ मंदिर किकली तालुका-वाई (सातारा)

हे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात वसलेल्या किकली गावातील पुरातन हेमाडपंती स्थापत्य असलेले मंदिर आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४पासून ५ किलोमीटर अंतरावर किकली हे गाव असून या ठिकाणी हे मंदिर आहे.

ऑक्टोबर महिन्यात या गावची यात्रा भरते. या यात्राचे वैशिष्ट्य हे आहे, की भैरवनाथाचा छबिना हा दिवसा असतो. ही यात्रा दसऱ्यानंतरच्या शनिवार व रविवार या दिवशी भरते. तसेच ही यात्रा या गावाचे बारा बलुतेदार भरवतात. तसेच शनिवारी रात्री होणारी ट्क्करही बघण्यासारखी आहे.
फलटण श्रीराम मंदिर-

त्याचबरोबर जिल्ह्यातील फलटण येथे संस्थानी वातावरणाच्या खुणा आढळतात. येथील श्रीराम मंदिर प्रसिद्ध आहे. फलटण हे महानुभव संप्रदायाचे प्रमुख केंद्र असून फलटणला महानुभव पंथाची काशीच म्हटले जाते. येथील श्रीकृष्ण मंदिर व चक्रधर स्वामींचे मंदिर प्रेक्षणीय आहे.
महाबळेश्वर व पाचगणी-

ही भारतातील सुप्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे सातारा जिल्ह्यात आहेत. ब्रिटिश काळात महाबळेश्र्वर ही मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी होती. ब्रिटिश अधिकारी लॉडविक यांनी या स्थानाचा प्रथम विकास केला. सह्याद्रीच्या रांगेत वसलेल्या एका गावाचे ग्रामदैवत महाबळी आहे. या महाबळीचे मंदिर यादव काळात यादव राजांनी बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. महाबळी या नावावरून आसपासच्या वस्तीचे महाबळेश्र्वर असे नामकरण झाले, अशी कथा प्रचलित आहे. पश्र्चिम घाटाची डोंगररांग, उंच कडे, खोल दऱ्या, दाट जंगले यांचे विपुल प्रमाण महाबळेश्र्वरमध्ये असून ब्रिटिश काळापासून काही मूलभूत सोयीसुविधांचा विकास येथे झालेला आहे. महाबळेश्र्वर हे समुद्रसपाटीपासून सुमारे १३७२ मीटर उंचीवर असून या उंचीवर पठारावर वसलेले आहे. येथील लॉडविक पॉईंट, विल्सन पॉईंट, बॉम्बे पॉईंट, एलफिस्टन पॉईंट, ऑर्थर सीट, लिंगमाळा धबधबा, वेण्णा तलाव इत्यादी ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. महाबळेश्र्वरजवळ क्षेत्र महाबळेश्र्वर येथे श्रीमहाबळेश्र्वराचे (महादेवाचे) मंदिर आहे. पूर्ण भारतातून येणारे तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकही येथे गर्दी करतात. महाबळेश्र्वरपासून सुमारे २० कि. मी. अंतरावर असलेले पाचगणी हेही जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असून याला लाभलेल्या निसर्गसंपन्नतेमुळे भारतातील स्वित्झर्लंड म्हटले जाते.
वासोटा किल्ला-

कोयना नदीच्या परिसरात वासोटा नावाचा दुर्गम किल्ला आहे. यास व्याघ्रगड असे म्हटले जाते. येथे मानवी वस्ती अतिशय कमी असून; वन्य श्र्वापदांचा येथे मुक्त संचार असतो. येथील परिसरात घनदाट जंगल असून पट्टीचे पर्यटक व गिर्यारोहक यांचे हे आवडते ठिकाण आहे. सातारा-कास-फळणी मार्गे वासोट्याला जाता येते.
अजिंक्यतारा-

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या खुद्द सातारा शहरात अजिंक्यतारा किल्ला आहे. हा किल्ला शिलाहार राजवटीत राजा दुसरा भोज याने बांधल्याची नोंद इतिहासात सापडते. १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणला होता. साताऱ्यातील छत्रपती वस्तुसंग्रहालयही प्रसिद्ध आहे.
शाहू महाराजांची समाधी-

शहराजवळील माहुली येथे कृष्णा-वेण्णा नद्यांचा संगम असून येथे छत्रपती शाहू महाराजांची समाधी आहे.
कास तलाव-

साताऱ्यापासून सुमारे २५ कि.मी. अंतरावरील कास तलाव हे ठिकाणदेखील अलीकडच्या काळात नैसर्गिक सुंदरता व शांताता यांमुळे प्रसिद्ध होत आहे. पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात.
वाई-

वाई हे सुंदर कृष्णाकाठ लाभलेले गाव असून येथे अनेक घाट नदीवर विकसित केलेले आहेत. वाईजवळ मेणवली येथे नाना फडणवीसांचा वाडा आहे, तसेच येथील गणपती मंदिरही प्रसिद्ध आहे. कोयना प्रकल्प (शिवाजीसागर), वेण्णा नदीवरील कन्हेर धरण व कृष्णेवरील धोम धरण ही सर्व ठिकाणे नैसर्गिकदृष्ट्या सुंदर आहेत. कोयना प्रकल्पाच्या परिसरात पंडित नेहरू स्मृती उद्यान विकसित करण्यात आले असून पर्यटक येथेही मोठ्या संख्येने भेट देतात. पालीचा खंडोबा, ठोसेघर धबधबा ही जिल्ह्यातील ठिकाणेही प्रसिद्ध आहेत. सातवाहन काळापासून अस्तित्वात असलेल्या या जिल्ह्यातील कर्‍हाडला कर्‍हाकडा असेही म्हटले जाते. येथून जवळ असलेल्या आगाशिवा डोंगरात बौद्धकालीन लेणी सापडली आहेत.
सामाजिक / विविध बाबतीत अग्रेसर
शिक्षण-

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातला परंतु त्यांनी शैक्षणिक कार्याची सुरुवात केली ती सातारा जिल्ह्यात. महात्मा फुलेंच्या विचारांतून व राजर्षी शाहूंच्या प्रत्यक्ष सहवासातून कर्मवीरांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली. विचारांती त्यांनी शिक्षण क्षेत्र निवडले; आणि १९१९ मध्ये कराड तालुक्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. १९२४ मध्ये रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. याच वर्षी कर्मवीरांनी छत्रपती शाहू बोर्डिंग हाउसची स्थापना केली. छत्रपती शिवाजी कॉलेज हे जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय रयत शिक्षण संस्थेच्या वतीने १९४७ मध्ये सुरू करण्यात आले. राजर्षी शाहूंचा वारसा चालवणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचवली. ‘स्वावलंबी शिक्षण’ आणि ‘कमवा व शिका’ ही सूत्रे विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचा विस्तार सातारा जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे. शैक्षणिकदृष्ट्या सातारा जिल्हा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. विद्यापीठाच्या अखत्यारीतील एकूण ५६ महाविद्यालये सातारा जिल्ह्यात आहेत. महाबळेश्र्वर तालुक्यातील पाचगणी येथे दर्जेदार निवासी शाळा आहेत. हे जिल्ह्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र बनले असून संपूर्ण भारतातून येथे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी विकसित केलेल्या कर्‍हाड येथील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि साताऱ्यातील सैनिकी प्रशिक्षण देणारी शाळाही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ही सैनिकी शाळा १९६१ मध्ये, यशवंतराव चव्हाण यांनी पुढाकार घेऊन स्थापन केली. ही भारतातील पहिली सैनिकी शाळा असून आज या शाळेत सुमारे ७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
इतर संस्था -

वाई येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्र्वकोश निर्मिती महामंडळाचे कार्यालय आहे. याच महामंडळाच्या कामाद्वारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी भाषेची सेवा केली व वाईचा लौकिक वाढवला.
पुण्यातील अप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट या संस्थेचे ग्रामीण उद्योजकता विकास केंद्र फलटण तालुक्यातील गणेशनगर येथे आहे.
डॉ. आनंद कर्वे हे थोर शास्त्रज्ञ या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. डॉ. कर्वे यांना पर्यावरण व ग्रामीण विकास क्षेत्रातील कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरील अँश्डेन पुरस्कार (ग्रीन ऑस्कर) प्राप्त झालेला आहे.
प्रसिद्ध/विशेष व्यक्ती[संपादन]
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज
समर्थ रामदास स्वामी
झाशीची राणी लक्ष्मीबाई
न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणे
नाना फडणवीस
यशवंतराव चव्हाण
कर्मवीर भाऊराव पाटील
क्रांतीसिंह नाना पाटील
सावित्रीबाई फुले
खाशाबा जाधव
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
प्राचार्य शिवाजीराव भोसले
नारायण हरी आपटे.
आमची माती आमची माणसं-
झाशीची राणी लक्ष्मीबाई (धावदाशी येथे जन्म), पेशवाईतील तत्त्वनिष्ठ न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे(माहुली)या दोहोंचा जन्म सातारा जिल्ह्यातच झाला होता. त्याचप्रमाणे थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, विष्णुशास्त्री पंडित, ‘सुधारक’कार आगरकर व भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रिबाई फुले यांचाही जन्म याच जिल्ह्यात झाला होता.
ज्यांची कारकिर्द नाशिक येथून बहरली असे यशस्वी नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म जिल्ह्यातील रहिमतपूर इथला, तर गो.पु.देशपांडे, बाळ कोल्हटकर, ज्येष्ठ कादंबरीकार रवींद्र भट (वाई) हे कलावंतदेखील मूळचे इथलेच.
ज्येष्ठ लेखिका गौरी देशपांडे यांचे वास्तव्य अनेक वर्षे फलटणजवळील विंचूर्णी या गावी होते. या गावाचे संदर्भ त्यांच्या लेखनात डोकावलेले दिसतात.
फलटण येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले गेली अनेक वर्षे वास्तव्यास आहेत. आपल्या ओघवत्या वाणीने, वैशिष्ट्यपूर्ण अशा वक्तृत्वशैलीच्या माध्यमातून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, श्रीरामकृष्ण परमहंस या व्यक्तिमत्त्वांचे एक निराळेच दर्शन महाराष्ट्राला घडवले आहे.
ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून देणारे श्री. खाशाबा जाधव हे कर्‍हाड तालुक्यातील गोळेश्र्वर या गावचे होते. श्री. जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्ती या खेळात कास्य पदक मिळविले होते. यांचे शालेय शिक्षण कर्‍हाडमध्ये झाले होते. ऑलिंपिकला जाण्यासाठी कर्‍हाडमधील लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले होते.
ज्येष्ठ लोककलावंत शाहीर साबळे व महाराष्ट्रातील प्रमुख उद्योजक श्री. बी.जी. शिर्के यांचा जन्म जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या गावचा. आपापल्या क्षेत्रात उच्च शिखर गाठल्यानंतरही या दोहोंनी आपल्या गावाशी संपर्क ठेवलेला आहे.
प्रितीसंगम

कर्‍हाड येथे कृष्णा-कोयना नद्यांचा संगम झाला आहे. या ठिकाणास प्रीतिसंगम म्हटले जाते. येथे कृष्णामाईचे मंदिर आहे. कर्‍हाडचे नाव स्व. यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. कर्‍हाडच्या (सातारा जिल्ह्याच्याही) शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीत यशवंतराव चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असणाऱ्या यशवंतरावांची केंद्रीय मंत्रीपदाची व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द गाजली, यशस्वी ठरली. ज्यांच्याकडे सांस्कृतिक जाण होती, विकासात्मक दूरदृष्टी होती अशा यशवंतराव चव्हाण यांची समाधी प्रीतिसंगमावर आहे.
महाराष्ट्र राज्य

राजधानी मुंबई

उपराजधानी नागपूर

प्रशासकीय विभाग कोकण • औरंगाबाद • अमरावती • नागपूर • नाशिक • पुणे

विषय इतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन

जिल्हे नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर

मुख्य शहरे अहमदनगर • अमरावती• औरंगाबाद • इचलकरंजी • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • सोलापूर • धुळे • जळगाव • सांगली • कराड • सातारा• मिरज

मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण · कन्नमवार · वसंतराव नाईक · शंकरराव चव्हाण · वसंतरावदादा पाटील · पवार · अंतुले · भोसले · निलंगेकर · सुधाकर नाईक · जोशी · राणे · देशमुख · शिंदे · अशोक चव्हाण · पृथ्वीराज चव्हाण

सावित्रीबाई फुले

               सावित्रीबाई फुले (जानेवारी ३, इ.स. १८३१ - मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
अनुक्रमणिका
१ चरित्र
२ सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित साहित्य
३ सावित्रीबाई संमेलन/पुरस्कार
४ अधिक वाचन


चरित्र

सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी जानेवारी ३, इ.स. १८३१ रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. स्त्री-स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पण बंधनांचा अर्थच ज्या वयात कळत नाही, त्या वयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला त्यांच्याही नकळत सुरुवात केली. एका दुबळ्या मुलाचे फूल हिसकावून घेणाऱ्या धटिंगणाला त्यांनी अद्दल घडविली, तर पक्ष्यांची अंडी खाणाऱ्या नागाला त्यांनी ठेचून मारले.

फाल्गुन कृष्ण पंचमी, शालिवाहन शक १७६५ (इ.स. १८४०) रोजी ज्योतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर ज्योतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. म्हणजे त्या वेळच्या रूढीनुसार लग्नाला उशीरच झाल्याचे मानले गेले. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.

सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केलेला. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. ज्योतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या.

‘त्यांनी केले ते माफ आणि आपण शिकलो की पाप’ हा ज्योतिरावांनी वडिलांना विचारलेला प्रश्र्न सावित्रीला पतीच्या ध्येयाची जाणीव देऊन गेला. ‘सेठजी, टाकलं पाऊल मागं घेऊ नका. तुमी शिकावं असं मलाबी वाटतं’.... या शब्दात त्यांनी पतीला ताकद दिली. ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला . त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे भिड्यांच्या वाड्यात शाळा सुरू झाल्यानंतर सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. त्या काळात लोक म्हणत जो शिकेल, त्याच्या सात पिढ्या नरकात जातील. त्यावर उपाय म्हणून त्यांना सांगण्यात आले की "गोऱ्या साहेबानं एक शोध लावलाय की, जो शिकणार नाही त्याच्या चौदा पिढ्या नरकात जातील". नरकाच्या भीतीने का हाईना लोक शिक्षणाला होकार देऊ लागले.

१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रिबाइनी पहिली मुलींची शाळा काढली. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.

सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत .

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.

ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.

केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.

इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.

इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून मार्च १०, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित साहित्य[संपादन]
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका : शैलजा मोलक)
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : ना. ग. पवार)
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : नागेश सुरवसे)
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (विद्याविकास) (लेखक : ज्ञानेश्वर धानोरकर)
त्या होत्या म्हणून (लेखिका : डॉ. विजया वाड)
साध्वी सावित्रीबाई फुले (लेखिका : फुलवंता झोडगे)
सावित्रीबाई फुले (लेखक : अभय सदावर्ते)
सावित्रीबाई फुले (लेखिका : निशा डंके)
सावित्रीबाई फुले (लेखक : डी.बी. पाटील )
सावित्रीबाई फुले -श्रध्दा (लेखक : मोहम्मद शाकीर)
सावित्रीबाई फुले (लेखिका : प्रतिमा इंगोले )
सावित्रीबाई फुले (लेखक : जी.ए. उगले)
सावित्रीबाई फुले (लेखिका : मंगला गोखले)
सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (लेखक : ना. ग. पवार)
’व्हय मी सावित्रीबाई फुले’ हे नाटक (एकपात्री प्रयोगकर्ती अभिनेत्री : सुषमा देशपांडे)
ज्ञान ज्योती माई सावित्री फुले (लेखिका : विजया इंगोले)
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका उषा पोळ-खंदारे)
सावित्रीबाई संमेलन/पुरस्कार[संपादन]
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक साहित्य संमेलन भरते. याशिवाय, द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन या नावाचे पहिले राज्यस्तरीय संमेलनही नागपूर येथे २-३ जानेवारी २०१२ या तारखांना भरले होते.
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने काही संस्थांनी पुरस्कार ठेवले आहेत. ते असे :-
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सामाजिक कार्यासाठीचा ’सावित्रीबाई फुले पुरस्कार’. हा पुरस्कार २०११-१२ सालापासून दरवर्षी, महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यास एका समाजसेविकेस दिला जातो. ५००१ रुपये रोख,व सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
चिंचवडगाव येथील महात्मा फुले मंडळाचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार
महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी(पुणे)तर्फे सावित्रीबाई तेजस कला राष्ट्रीय पुरस्कार
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ’आदर्श माता’ पुरस्कार
क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
सावित्रीबाई फुले महिलामंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना दिले जाणारे स्त्रीरत्न पुरस्कार : आदर्शमाता रत्न, उद्योग रत्न, कला रत्न, क्रीडा रत्न, जिद्द रत्न, पत्रकारिता रत्न, प्रशासकीय रत्न, वीरपत्नी रत्न, शिक्षण रत्न, वगैरे.
मराठी पत्रकार परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
मध्य प्रदेश सरकारचा उत्तम शिक्षिकेसाठीचा एक लाख रुपयांचा वार्षिक सावित्रीबाई पुरस्कार (२०१२ सालापासून)