आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Friday 30 November 2012

लोककला - ३

८. शाहिरी
तुणतुण्याला ताण देऊन डफावर थाप पडली की मराठी मन शहारून उठतं. नसानसातून शूरत्वाचा वारसा सळसळू लागतो. देदिप्यमान इतिहासाबद्दल अनन्यसाधारण अभिमान बाळगणारे मराठी मन पोवाड्यांमधील पराक‘मांच्या वर्णनाने भारावून जाते. शाहिरी ही संकल्पना जरी अन्य भााषेतून घेतली गेली असली, तरी तिचा गाभा मात्र मराठीपणाने रसरसलेला आहे. ही कला पूर्णत्वाने महाराष्ट्राच्या जीवनाशी एकरूप झालेली आहे. तिच्या अंतरंगातून महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांचा इतिहास उलगडत जातो. वीरांच्या गाथा मांडताना शाहिरांचा डफ जसा कडाडून उठतो, तसाच तो पळपुट्यांवर तुच्छतेनं हसतो देखील. पण त्याचं हसण किंवा त्याचं कडाडणं हे सर्वस्वी अवलंबून आहे ते मराठी माणसाच्या भावनांवर. मराठी मन जसा विचार करत असेल, तसाच पोवाडा बोलत राहतो.

संशोधकांना सापडलेला सर्वात जुना पोवाडा आहे अगिनदास ऊर्फ अज्ञानदास याने अफजलखान वध या प्रसंगावर लिहिलेला. यापेक्षा जुना पोवाडा सापडला नसल्याचे ज्येष्ठ अभ्यासक श्री. म. वर्दे यांनी नमूद केले आहे. शाहिरांमध्येही दोन संप्रदाय आहेत, पैकी एक कलगी व दुसरा तुर्रा. या दोन्ही संप्रदायांमध्ये जेव्हा सवाल -जबाबाचे फड रंगतात, तेव्हा यांच्यातील चुरस खर्‍या अर्थाने लक्षात येते. सर्वच शाहीर बावन्न वीरांना आवाहन करतात. प्रतिस्पर्ध्याला चीतपट करण्यासाठी वीरांना आवाहन करताना ते म्हणतात.


महावीरपर टोला मरीका, आया हुंदाडा भैरवका ।
नरसिंग झोटिंग अलग उडाऊ, पता लगेना शाहिरका।।
बावन वीर की गर्दन चाबू, तुटा कलीजा बजरंगका।।

वीराला आवाहन करून प्रतिपक्षाच्या शाहिराला चीतपट करण्याचा प्रयत्न शाहीर करत असतो. वीर किंवा बीर म्हणजेच यक्ष होय. अवघड प्रश्न विचारणारा, ज्ञानाने परिपूर्ण असणारा हा यक्ष प्रतिस्पर्ध्याची भंबेरी उडवून टाकतो अशी धारणा आहे.

काही अभ्यासकांच्या मते यादवकालीन राजा रामदेवरायाच्या पूर्वीपासून पोवाड्यांची किंवा शाहिरीची परंपरा आहे. पण मराठी शाहिरीचा इतिहास शिवकालापासूनच अधिक ठळकपणे जाणवू लागतो. शाहिरी किंवा पोवाडे ही कला तशी वीररसाने ओतप्रोत असणारी, पण समाजमनाच्या बदलानुसार ती बदलत गेली व तिने पराक‘मासोबतच सौंदर्याच्या वर्णनातही आपली कल्पकता व ताकद सिद्ध केली. पण, हे सर्व घडत असताना एखादी कला समृद्ध होण्यासाठी जे सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय वातावरण भोवताली असणे आवश्यक असते, ते वातावरण मराठी शाहिरीच्या नशीबी नव्हते. त्यामुळे प्रगती आणि अधोगतीचा खेळ खेळत, पडत-उठत मराठी शाहिरी वाढत राहिली असे म्हणण्याची पाळी येते.


ग्रंथराज ज्ञानेश्र्वरीच्या रचनेनंतर व संत ज्ञानेश्र्वरांच्या संजीवन समाधीनंतर अवघ्या वीस वर्षांत मुघल आक्रमकांनी अवघा मराठी मुलूख काबीज केला आणि एकूणच मराठी साहित्याला उतरती कळा लागली. अधोगतीला निघालेला हा मराठी साहित्य प्रवाह काही संतांनी आपापल्या परीने वाचविण्याचा प्रयत्न केला, पण शाहिरीचा मागमूस मात्र या काळात फारसा लागत नाही. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मराठी मनात एक आशेचा किरण निर्माण झाला. तेव्हापासून पुन्हा शाहिरांच्या वाणीला उधाण आले आणि त्यांनी मराठी प्रांताला, मावळ्यांना स्वराज्यासाठी शीर तळहातावर घेऊन लढण्याची प्रेरणा दिली. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणार्‍या अनेक संशोधकांना आज इतर कोणत्याही साधनापेक्षा पोवाडे आधिक विश्वासार्ह वाटू लागले आहेत ते यामुळेच. कारण पोवाडे हे मराठी मनाच्या चढउतारानुसार सहजपणे उमटलेले हुंकार आहेत. शिवरायांच्या पराक‘माने अवघी मराठी माती पावन झाली आणि स्वाभिमानाने भरून आलेल्या हिंदवी स्वराज्याचा उर पोवाड्यांनी उत्तेजीत होऊ लागला. स्वातंत्र्याच्या संग‘ामात जीवनाची आहुती देण्याचा विचार आणि धाडस अठरापगड जातींच्या मनात निर्माण करण्याचं महान कार्य पोवाड्यांनी (ते रचणार्‍या शाहिरांनी) केलं.

शिवरायांच्या अंतानंतर पुन्हा मराठी शाहिरीला उतरती कळा लागली ती अगदी छत्रपती शाहूंच्या राजवटीपर्यंत. छत्रपती शाहूंच्या राजवटीत शाहिरांना राजाश्रय मिळाला आणि पुन्हा डफ गर्जू लागले.

शाहू छत्रपतींच्या उत्तर काळात म्हणजे पहिल्या बाजीरावाच्या निधनानंतर पराक‘माचे पोवाडे बाजूला पडले आणि रंगेलपणाचा जोर वाढू लागला. पराक्रमापेक्षा शृंगाराला उधाण आले. प्रथम पोवाड्यात लावण्यांचा शिरकाव झाल्यानंतर त्याचा स्वीकार झाला नाही. पण नंतरच्या काळात पोवाड्याचे स्वरूप व उद्देशच बदलून गेला. एकूणच स्त्री-पुरुष संबंध, सौंदर्य, रंगबाजी अशा गोष्टींना लावण्यांनी पूज्यस्थानी नेऊन ठेवले. पेशवेकाळातील स्थैर्याचा हा विपरीत परिणाम समाजावर व समाजाचा पोवाड्यांवर झाला.

पेशवेकाळात घडलेली सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे या काळातल्या शाहिरांना शिवशाहीचा पूर्णत: विसर पडला. या गोष्टीवर अनेक अभ्यासकांनी आक्षेप घेतले. खरेतर बलिदानाचे पोवाडे गाऊन आजच्या पिढीला भवितव्यासाठी बलिदानाची शिकवण देणारे शाहीर! पण पुढील काळात शाहिरी काहीशी बेभान झाली ही गोष्ट खेदजनक आहे. आज जे काही पोवाडे सापडतात, ते बहुतांशी पेशवेकाळातीलच आहेत.

एकूणच, चढउतार करत आजपर्यंत शाहिरीने आपला प्रभाव आणि डौल राखण्यात यश मिळवलं आहे. पण आजकाल पोवाड्यांची चक्की मात्र खूपच कमी दिसते. गावा-गावातून आता दरवर्षी पोवाडे होत नाहीत.

तमाशा, ऑर्केस्ट्राशी तुलना केली तर निव्वळ महाराष्ट्राची भाषा बोलणारी ही मराठमो
ळी, रांगडी कला किती दुर्लक्षित होते आहे हे लक्षात येते.

रामजोशी, अनंत फंदी, होनाजी बाळा, प्रभाकर, परशराम, सगनभाऊ आणि इतर शाहिरांनी पोवाडे आणि लावण्यांच्या माध्यमातून शृंगारासोबत प्रबोधनही केले. शाहिरीला अध्यात्माचं वेड कमी आहे, पण प्रपंचाची ओढ मात्र सुरुवातीपासून आहे.

‘स्वरूपाची होईल माती। घडी ही लाखाची जाती।'
अशा ओळींमधून `आहे तो क्षण सत्कारणी लावण्याचा सल्ला' शाहीर देतो, तर शृंगार सांगताना वाह्यातपणा घडू नये म्हणून असा सावधानपणाचा सल्लाही शाहीर देतो. पेशवेकाळाचं वर्णन करताना
‘‘ब्राह्मणी राज्य जोरदार घोड्यावर स्वार होते शिपाई।
जबर सद्दी कैकांनी पाहिली शत्रु ठेविले नाही।।’’
अशा भाषेत ब्राह्मणी कलेची महती सांगतात.

इतिहासाचा मागोवा, पराक्रमाचा जयजयकार आणि प्रबोधनातून शूर जन्माला घालणारी ही कला येत्या पिढीला घडविण्याच्या कामी येऊ शकते व त्यासाठी तिचे संगोपन व संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
 

९. भारूड :
महाराष्ट्रातील लोककलांमध्ये ज्या लोककला आजही अखंडपणे व तेवढ्याच ताकदीने उभ्या आहेत, त्यापैकी भारूड ही एक महत्त्वाची कला. ग्रामीण महाराष्ट्रात तमाशाखालोखाल या कलेचे आकर्षण आहे. वार्षिक ज्ञानेश्र्वरी पारायण, तुकाराम गाथा पारायण, यात्रा किंवा इतर उत्सवांमध्ये भारूडाचे स्वतंत्रपणे आयोजन केले जाते.

लोकमानस जिंकण्याची ताकद असणारी ही कला जेवढी रंगतदार आहे तेवढीच ती प्रबोधकही आहे, नाट्य, वक्तृत्व आणि संगीताच्या मिलाफातून रंगत जाणारे हे भारूड अध्यात्माच्या प्रसाराचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. संत एकनाथ हे या वैशिष्ट्यपूर्ण कलेचे जनक होत.

मध्यभागी बसलेला वीणेकरी त्याच्या एका बाजूला मृदंगवादक व दुसर्‍या बाजूला पेटीवादक (हार्मोनियमवादक) असतो व भोवताली पंधरा-वीस टाळकरी असतात. थोड्या-बहुत फरकाने कीर्तनासारखी भारुडाची बैठक बसते. सुरुवातीला ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठऽऽल श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा गजर होतो आणि ‘विठोबा रखुमाई’ चे भजन सुरू होते. रंगतदार सुरुवातीसाठी बराच वेळ हे भजन उत्साहाने गायले जाते आणि शेवटी रंगात आलेल्या श्रोत्यांना सोबत घेऊन ‘पुंडलिक वरदे’ चा सभामंडप दुमदुमून टाकणारा जयघोष होतो.

उत्साह, लगबग, रंगतदार चाली, संगीत, खुसखुशीत निवेदन या भारुडाच्या जमेच्या बाजू असतात. भजन संपलं की निवेदक (भारूडकार) उभा राहतो आणि आपल्या श्रवणीय शैलीत लोकांच्या डोळ्यासमोर एक चित्र उभे करतो. भारुडाच्या सुरुवातीसाठी त्याला लोकांना-आपण एका गावात घडणारी नित्याची कथा ऐकतो आहोत याची-कल्पना द्यावी लागते. मग या गावाचा दिनक‘म पहाटेपासून सुरू होतो. सडा-रांगोळी होते. पक्षांचा किलबिलाट, गुरांचे हंबरणे आणि अशा तजेलदार वातावरणात जात्यावर ओव्या गाणार्‍या महिला सुरात गाऊ लागतात.
सुंदर माझं जातं ग,
फिरतं बहुत...
ओव्या गाऊ कौतुके तु,
ये रे बा विठ्ठला...
भारुडात मध्ये-मध्ये लोकसंस्कृतीतल्या अशा गीतांची पेरणी केली जाते. यानंतर निवेदकाचे ग‘ामवर्णन सुरू असते. एवढ्यात ‘दान पावलं, दान पावलं’ म्हणत वासुदेवाची स्वारी गाव जागवायला मंचकावर हजर होते. मोरपिसाची टोपी घातलेलं हे त्याचं रूप पाहून पहाट झाल्यासारखं वाटू लागत. अभंगामधून लोकांना रामनाम जपण्याचा उपदेश देऊन तो नाचत-नाचत निघून जातो. तेवढ्यात हातात काठी घेऊन जोशीबुवा हजर होतात. जोशीबुवा लोकांना चार उपदेश करतात आणि निघून जातात. एकामागे एक येणार्‍या या लोककलावंतांचा ठसा श्रोत्यांच्या मनावर उमटत जातो, तशी उत्सुकता वाढत जाते. आता कोण येणार म्हणून लोक इकडे तिकडे पाहू लागतात. एवढ्यात जोरजोरात आरोळ्या ठोकत, तोंडाने भयावह आवाज काढत, हातातल्या असुडाचे फटके अंगावर घेत मरीआईचा भक्त येतो. कडकलक्ष्मीचा तो अवतार पाहून मुलं आईला बिलगतात. सारा श्रोतृवर्ग कुतूहलाने तो रुद्र अवतार पाहू लागतो. ‘दार उघड बये दार उघड’ म्हणत, देवीला प्रश्र्न विचारले जातात. सहसा हे प्रश्र्न विनोदी ढंगाचे असतात, पण त्यातून प्रबोधनही करण्याचा प्रयत्न केला जातो.

अशा प्रकारे एकेक लोककलावंत आपली कला सादर करून जातो. ग्रामजीवनातील एकेक प्रश्न उलगडत जातो. संसारातला वैताग मांडला जातो, तसाच आनंदही मांडला जातो. निखळ लोकरंजन करताना भारूड सादर करणारी मंडळी श्रोत्यांवर असणारी आपली पकड कधीही सैल होऊ देत नाहीत. निवेदनासोबत संगीत आणि नाट्यमय प्रसंगांची पेरणी करत अगदी पहाटेपर्यंत भारूड रंगत जाते. मग त्यात ‘विंचू चावला’, ‘दादल्या नको ग बाई’ अशी रंगतदार भारुडे लोकांना पोटभर हसायला लावतात आणि संसारातली गुपितं उघडी करून जातात. भारूडांमध्ये वरवर पाहिले असता विनोद व मनोरंजन दिसते. पण ही गीते व अनुषंगाने येणार्‍या कथा या ‘रूपकात्मक’ (रूपक अलंकाराने युक्त) असतात. बहुतांश भारूडांमधून भौतिक सुखांचा उपभोग घेत असतानाच, उपभोगांवर मर्यादा ठेवून परमार्थ कसा साधावा, याबाबतचे आध्यात्मिक मार्गदर्शन केले जाते.

एकूणच भारूड ही लोककला महाराष्ट्राच्या लोकजीवनातली एक समृद्ध, प्रभावी आणि प्रबोधक कला आहे आणि ही कला जोपासण्याचं कार्य अनेक कीर्तनकार, भारूडकार, संशोधक, अभ्यासक व लेखक मोठ्या हिरीरीने करत आहेत. ही आशादायक आणि समाधानकारक बाब आहे.
 
 
१०. तमाशा :
तांबड्या फेट्यांचा हलता-डुलता सागर, शिट्ट्यांचा आवाज, हवेत तरंगणारे रुमाल आणि या सार्‍या वातावरणाला आपल्या ठेक्यात बांधून ठेवणारी ढोलकी, ढोलकीच्या तालावर थरथरणारी घुंगरं आणि घुंगरू बांधून नर्तन करणारी कलावंत - ‘या बसा मंचकी राया’ असे म्हणत महाराष्ट्राच्या मनामनातून डोलते आहे.

शेतात राबणार्‍या रांगड्या गड्याचा रंगेलपणा बघावा तो तमाशातच. बेभान होऊन डुलण्याचा असा मोका वर्षाच्या जत्रेशिवाय गावगाड्याला मिळत नाही. म्हणूनच तमाशा आपल्या अढळपदावरून हालत नाही. मराठी मन जसं अध्यात्माला आपल्या जीवनात अढळपद देतं, तसं ते रंगबाजीचे, मनोरंजनाचे दरवाजेही बंद करीत नाही. महाराष्ट्राच्या याच रंगेल मनाला उधाण येतं ते फक्त तमाशा - लावणीच्या फडासमोरच. शतकानुशतके चालत आलेली ही लोककला, लोकपरंपरा आजच्या पिढीलाही मोहविते याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तमाशाने मराठी मनाची नेमकी गरज ओळखली आणि त्या पद्धतीनं या कलेची रचना केली गेली.

तमाशाचा उगम विधिनाट्यापासून झाला असे अभ्यासकांनी नमूद केले आहे. विधिनाट्य आणि तमाशाच्या रचनेतही साम्य आढळून येते.
विधिनाट्यतमाशा
देवाचा पूजाविधीरंगभूमीची पूजा
गणेश वंदन गण
आवाहन गौळण
देव देवतांचे स्तवन बतावणी
आख्यान वग
आरती मुजरा
विधिनाट्याच्या आणि तमाशाच्या या रचनांवरून दोन्हीमध्ये असणारे साम्य व तमाशाच्या उगमा- विषयीच्या अभ्यासाला पुष्टी मिळते. त्याचबरोबर सातवहनांच्या राजवटीत चालत असणार्‍या रतिनाट्याची रचना तमाशासारखीच वाटते, असेही काही अभ्यासकांनी नमूद केले आहे.

तमाशाची जडणघडण मांडत असताना अभ्यासकांनी महाराष्ट्रातल्या इतर लोककलांमधील एकेक गुण घेऊन तमाशाची बांधणी झाल्याचे मत मांडले आहे. पूर्वीपासून प्रचलित असणार्‍या गोंधळ, मुरकी, शाहीरी अशा लोककलांमधून एकेक वैशिष्ट्य उचलून तमाशा ही एक वेगळीच रंगतदार लोककला जन्माला आली. त्यासाठी शाहिरांनी आपल्या शृंगारिक लावण्या दिल्या, तर मुरकी, कोल्हाटीण अशा लोककलांनी तमाशाचं प्रमुख आकर्षण असणारी ‘नाची’ म्हणजेच नर्तकी तमाशाला दिली. नंदीवाल्याचा ढोल आणि कोल्हाटणीची ढोलकी या दोन्हींच्या मिश्रणातून तमाशाची ढोलकी तयार झाली. लोकमनाला भावलेली अशी एकेक अस्सल वस्तू जमा करत-करत बावनकशी तमाशा आकाराला आला आणि त्याने लोककलांच्या मांदियाळीचा लोकप्रियतेचा कळस गाठला.

गावोगावी भरणार्‍या जत्रांच्या निमित्ताने तमाशाच्या फडांचे आयोजन केले जाते. तमाशाच्या अतिश्रृंगारीक व इरसाल भाषेमुळे महिला वर्ग या कलेपासून चार हात लांब राहणेच पसंत करतो. पण तमासगीरांची भावना मात्र ‘आतुन कीर्तन वरून तमाशा’ अशीच असते. अस्सल ग्रामीण भाषेत काहीसे अश्लीलतेकडे झुकणारे, द्वि-अर्थी विनोद करून बोलणारी तमाशातली पात्रं रसिकांना हसता हसता लोळायला लावतात.

ढोलकीचा तमाशा आणि संगीत तमाशा असे तमाशाचे प्रमुख दोनच प्रकार असले तरी खानदेशी तमाशा, वायदेशी तमाशा, खडी गंमत, कोल्हाटणीचा तमाशा, त‘ती तमाशा असेही तमाशाचे प्रकार आहेत. प्रत्येकाची सादरीकरणाची पद्धत, बतावणी वेगवेगळी असते. तमाशाची मांडणी मात्र एकसारखी असते. ‘तमाशा’ चे सादरीकरण पुढील क्रमाने केले जाते.
गण -
रंगमंचाचं पूजन झाल्यानंतर सर्व कलाकार रंगमंचावर येऊन तमाशा रंगतदार व्हावा म्हणून श्रीगणेशाला साकडं घालतात.
आधी गणाला रणी आणा।
नाही तर रंग पुन्हा सुना-सुना ।।धृ।।
म्हणत गणरायाला प्रथम मान दिला जातो. ह्याचा आशीर्वाद नसेल, तर पुन्हा सारा रंग सुना होऊन जातो अशी धारणा या कलावंतांमध्ये आहे.
गवळण -
गणानंतर गवळणींचा मेळा येतो. सार्‍या गवळणी सजून-धजून मथुरेच्या बाजारला निघालेल्या असतात. त्यांच्या -बरोबर जुनी जाणती म्हणून एक मावशीही असते. मावशीचा वेश घेऊन वावरणारा हा कलावंत थोडीशी वेगळ्या धाटणीची भाषा बोलतो. त्यात तमाशाच्या मानाने सभ्य वाटणारे विनोद साधले जातात. बाजाराला जाणार्‍या या गौळणींच्या (गवळणींच्या) वाटेत पेंद्या आणि कृष्ण आडवा येतो. ‘गवळण’ म्हणून देवाची भक्ती करा, मगच तुमची वाट सोडू म्हणत पेंद्या त्यांना दम देतो आणि गवळणी सुरू होतात.
लावणी - रंगबाजी
तमाशातला हा सर्वात रंगतदार भाग. कुठल्यातरी गावचा मारखाऊ सरपंच गावच्या जत्रेसाठी तमाशा ठरवायला जातो. तिथं त्याची गाठ नायकीणीशी पडते आणि दोघांमधल्या संवादाने हास्याचा सागर उसळतो. त्यानंतर लावण्या सादर केल्या जातात. मध्ये मध्ये विनोदांची पेरणी, तमाशा ठरविण्यासाठी दरातली घासाघीस या सर्वांमध्ये प्रेक्षक दंग होऊन जातो.
वगनाट्य -
सत्य घटनांवर आधारित किंवा काल्पनिक कथांचं नाट्यरूपांतर म्हणजे वगनाट्य होय. ‘विष्णू बाळा’ हे एक त्यातलं गाजलेलं वगनाट्य. ‘गाढवाचं लग्न’ हे काल्पनिक वगनाट्यही लोकप्रियता मिळवून गेलं. ग्रामीण जीवनाशी संबंधित, नातेसंबंधावर आधारित, समकालीन राजकारणावर भाष्य करणारे - अशा विषयांवर बेतलेलं वगनाट्य रसिक जागा न सोडता पहाटेपर्यंत बघत राहतो व शेवटी मुजरा करून तमाशाची सांगता होते.

इतर काही लोककलांप्रमाणेच तमाशाचा बहराचा काळ म्हणजे पेशवाई . पेशवाईत अनेक शाहिरांनी व नर्तकींसह अन्य कलाकारांनी तमाशाला वैभवाला नेऊन ठेवलं. अनंत फंदी, रामजोशी, होनाजी बाळा, प्रभाकर, पठ्ठे बापुराव अशा अनेक शाहिरांनी आपल्या शृंगारीक लावण्यांनी मराठी मन बेहोश केलं आणि तमाशाला अढळपद प्राप्त करून दिलं. लोककलांमधील ही कळसाची शोभा अखंडपणे झळकत राहो.
 
 
११. कीर्तन :
‘कीर्तने वाचा पवित्र। कीर्तने होय सत्पात्र।
कीर्तने प्राणिमात्र। सुशील होती...।।
समर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकातून कीर्तनाचा महिमा स्पष्ट होतो. महाराष्ट्र ही संत-महंतांची, वारकर्‍यांची भूमी आहे. या संस्कारमय ज्ञानतीर्थावर संत ज्ञानेश्र्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला व भागवत धर्म प्रसारकांनी ही इमारत तेजस्वी बनविली. संत तुकोबांच्या रूपाने भक्तिमार्गाचा कळस आणखी तेजाने चमकू लागला. धर्मापासून ते नित्यक‘मांपर्यंत आणि सामाजिक प्रश्नांपासून ते मोक्षापर्यंत प्रत्येक गोष्टीत संत समाजाचे मार्गदर्शक झाले, आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी ज्या साधनाचा सशक्त आधार त्यांना लाभला, ते म्हणजे कीर्तन.

संशोधकांच्या मते - ‘कीर्तनाचा उगम उपनिषद काळात झाला-असा उल्लेख आढळत असला, तरी पुराणकाळात ही संस्था उदय पावली असावी. तर काही अभ्यासक कीर्तन परंपरा वैदिक काळापासून आहे असेही सांगतात.
नाचु कीर्तनाचे रंगी।
ज्ञानदीप लावू जगी।
असे म्हणत विश्वाला ज्ञानाची कवाडे खुली करून देणारी ही कला एवढ्या दीर्घ काळानंतरही तेवढीच रसपूर्ण आहे. खेडोपाड्यातून आजही अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केले जातात. या सप्ताहात महाराष्ट्रातले वेगवेगळे कीर्तनकार बोलवून प्रबोधनाचे कार्य केले जाते. रात्री होणार्‍या या भगवत भजनास पूर्ण गाव गोळा होतो.

वक्तृत्व, कथा-कथन, एकपात्री, काव्य, संगीत या सर्वांचा सुंदर मिलाफ असणारी ही कला अवगत करणे ही तशी अवघड बाब आहे. पण अनेक वर्षे अविश्रांत अभ्यास आणि साधना करून कीर्तनकार झालेले लोक आपल्या श्रोत्यांच्या मनावर आपल्या ज्ञानाचा व सादरीकरणाचा ठसा उमटविण्यात यशस्वी होतात.

संत ज्ञानेश्र्वर माउली, संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत चोखामेळा आदी संतांच्या अभंगांच्या अनुषंगाने भक्तिमार्ग सांगितला जातो, आध्यात्मिक मार्गदर्शन केले जाते, संसारापासून अ ‘लिप्त’ राहण्यास सांगितले जाते. संत नामदेव हे कीर्तन कलेचे प्रवर्तक मानले जातात, त्यांच्या या क्षेत्रातील अधिकार मोठा मानला जातो.

कीर्तनकारांचेही वेगवेगळे संप्रदाय आहेत व त्या-त्या संप्रदायाच्या नियमानुसार ते कीर्तन करत असतात. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात समृद्ध परंपरा म्हणजे वारकरी संप्रदाय.

वारकरी सांप्रदायिक कीर्तन -
मध्यभागी विणेकरी आणि त्याच्या शेजारी चोपदार उभा असतो. त्यांच्यामागे अर्धगोलाकारात टाळकरी उभे असतात. एका बाजूला मृदंगवादक तर दुसर्‍या बाजूला पेटीवादक (हार्मोनियमवादक) असतो.

प्रारंभी वीणेकरी (ज्याच्या गळ्यात वीणा आहे तो) ‘रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी’ हे नामसंकीर्तन सुरू करतो. मृदंगवादक भजनी ठेका धरतो आणि टाळकरी पदन्यास घेऊ लागतात. नामसंकीर्तनाची गती वाढत जाईल तसा वातावरणात उत्साह भरत जातो. त्यानंतर ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ हा ध्यानाचा अभंग होतो. अभंगानंतर ‘जय जय विठोब्बा रखुमाई’ चा गजर होतो. हा गजर सुरू असतानाच डोक्याला केशरी फेटा, अंगात नेहरू झब्बा, कमरेला धोतर, खांद्यावर उपरणं, कपाळाला अष्टगंध व बुक्क्याचा टिळा लावून कीर्तनकार व्यासपीठावर येतात. वीणेकर्‍याचं दर्शन घेऊन ते वीणा आपल्या गळ्यात घेतात. पुन्हा ‘रामकृष्ण हरी’ हे भजन होते. ‘रूप पाहता लोचनी’ हा रूपाचा अभंग होतो. पुन्हा ‘रामकृष्ण हरी’ भजन व त्यानंतर निरूपणासाठी घ्यावयाचा अभंग गायला जातो. यानंतर ‘विठोब्बा रखुमाई’ ह नामस्मरण घेऊन, वीणा दुसर्‍याकडे देऊन कीर्तनकार निरूपणाला सुरुवात करतात. दृष्टांत, कथा, विनोद, श्र्लोक, ओव्या, इतर अभंग अशा अनेक गोष्टींचा आधार घेऊन, त्या अभंगाचा अर्थ ते लोकांना उलगडून सांगतात.

वारकरी संप्रदायाबरोबरच कीर्तनकलेसाठी ओळखले जाणारे इतरही संप्रदाय आहेत. नारदीय कीर्तन, रामदासी कीर्तन, भराडी हरिकथा, कैकाडी सांप्रदायिक कीर्तन, संत गाडगेबाबा संप्रदायाचे कीर्तन-असे इतर अनेक संप्रदाय असून, त्यांच्याशी संबंधित ‘कीर्तनप्रकार’ आहेत. सर्व संप्रदायांतील कीर्तनांचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे सामान्य जनांना लौकिक सुख-दु:खांचा सामना करण्यास सक्षम बनवणे व त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणे.

स्वातंत्र्यसंग्रामा दरम्यान लोकमान्य टिळकांनी कीर्तनाला राष्ट्रजागृतीचे साधन बनविले. कीर्तनातून समाज सुधारकांची, क्रांतिकारकांची चरित्रे गायली जाऊ लागली. लोकसंपर्क आणि प्रबोधनासाठी उपयुक्त अशा या कलेने स्वातंत्र्य समरातही आपले योगदान दिले. आजही ही कला आपले प्रबोधनाचे कार्य अखंडपणे करत आहे.

शतकानुशतके चालत आलेली ही कला मोक्षमार्गाचा, ज्ञानप्राप्तीचा, जनजागृतीचा प्रवाह बनून अखंड वाहत राहील यात शंका नाही.
 

No comments: