आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Wednesday 28 November 2012

महाराष्ट्रातील किल्ले-2

तोरणा -
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सर्वप्रथम जिंकून आपल्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.

या गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे १४०४ मी. आहे. गडावर जाण्याकरिता अतिशय अरुंद, अवघड अशी वाट आहे, आजही सरळ-सोपी, पायर्‍या-पायर्‍यांची वाट नाही. काही लोखंडी गज मार्गावर रोवलेले आहेत. त्या गजांचा आधार घेत गड चढावा लागतो. ह्या गडाची चढण गिर्यारोहणाचा आनंद देते. गडाच्या आजुबाजुला असलेल्या गर्द झाडीमुळे गड अतिशय सुंदर दिसतो. एका इंग्रज अभ्यासकाने, ‘‘सिंहगड ही सिंहाची गुहा अन् तोरणा हे गरूड पक्षाचे घरटे आहे’’, असे उद्गार या गडाबद्दल काढले आहेत. या किल्ल्यावर बांधकाम करत असताना छत्रपतींना प्रचंड धन सापडले, ज्याचा उपयोग पुढे स्वराज्यासाठी झाला.

तोरण गडावर श्री तोरणाजाई मंदिर, बिनी दरवाजा, गंगाजाई मंदिर, झुंजारमाची टकमक बुरुज, बालेकिल्ला, कोकण दरवाजा, हनुमान बुरुज, वेताळ इ. महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू आहेत. बालेकिल्ल्यावरून पूर्वेस पाहिले की, सिंहगड, पुरंदर, खडकवासला धरण, रायरेश्वर इ. भाग दिसतो, तर पश्चिमेकडील बाजूस, प्रतापगड, मकरंद गड व लांबवरचा रायगडही दिसतो.

भोर संस्थानातर्फे अश्विन महिन्यात नवरात्रीच्या कालावधीत गडावर मोठा उत्सव भरतो. तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे या तालुक्यात आहे. पुण्यापासून वेल्ह्याला जाण्यासाठी सतत गाड्या आहेत.
विशाळगड -
विशाळगडाचे नाव ऐकताच समोर येतो तो बाजीप्रभू देशपांडे यांचा घोडखिंडीतील पराक्रम. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचून तेथील तोफेचा आवाज कानी येईपर्यंत बाजीप्रभूंनी घोडखिंडीत शौर्याने शत्रुला रोखले. शेवटी त्यांच्या हौतात्म्याने घोडखिंडीची ‘पावनखिंड’ झाली.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड हा १३४४ फूट उंचीवर असून गडाचे आवार सुमारे ३ कि. मी. लांब व १ कि. मी. रुंद आहे. गडावर महादेवाचे देऊळ, फुलाजी व बाजीप्रभु यांच्या समाधी, राजाराम महाराजांच्या पत्नी आहिल्याबाईंचे (अंबिका) स्मारक, सरकारवाडा, पिराचा दर्गा, भोपाळ तळे इ. ऐतिहासिक वास्तू आहेत. गडावर जाण्यासाठी पाऊलवाट आहे. पावसाळ्यात गडावरून आजुबाजुचे निसर्ग सौंदर्य हे अधिकच चांगले दिसते. विशाळगड हा पन्हाळ्यापासून सुमारे ४९ कि. मी. अंतरावर आहे. पावसाळा वगळता गडाच्या पायथ्यापर्यंत एस.टी. जातात. जवळच गजापुरची पावनखिंड आहे. पर्यटकांसाठी गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘गजापूर’ या गावात मुक्कामाची सोय होऊ शकते. अनेक गिर्यारोहक या गडाला भेट देतात. शिवकाळातील इतिहासाची, बाजीप्रभूंच्या पराक्रमाची आठवण म्हणून आजही असंख्य तरुण, इतिहासप्रेमी, गिर्यारोहक पन्हाळा - ते - विशाळगड असा प्रवास करतात.
दौलताबाद (देवगिरी) -
यादवांनी बांधलेल्या देवगिरी किल्ल्यासारखा संपूर्ण महाराष्ट्रात किल्ला नाही. महम्मद तुघलकने या देवगिरीचे ‘दौलताबाद’ नाव केले. १५२६ पर्यंत इथे बहामनी सत्ता होती. त्यानंतर औरंगजेबच्या मृत्यूपर्यंत (१७०७) हा किल्ला ‘मुघलांकडे’ होता. सुमारे २०० मी. उंचीवर हा किल्ला आहे. किल्ल्याला ७ वेशी असून २ कि.मी. लांबीचा अभेद्य तट आहे. किल्ल्यावर एक उंच स्तंभ आहे, त्याचबरोबर हत्ती हौद, भारतमातेचे मंदिर, चिनी महाल, मीठ अंधेरी मार्ग, खंदक इ अनेक ऐतिहासिक वास्तू या किल्ल्यात आहेत. दिल्लीच्या कुतुबमिनारची आठवण करून देणारा निरीक्षणासाठीचा मनोरा हे एक वैशिष्ट्य येथे बघता येते. संत एकनाथ यांचे गुरू जनार्दन स्वामी यांची समाधी याच किल्ल्यावर आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या वर्षात कोणाही स्वारी करणार्‍या राजाला तो लढून जिंकता आला नाही.

औरंगाबादपासून फक्त १३ कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. औरंगाबादपासून वाहनांची व्यवस्था उत्तम प्रकारे आहे. जवळच अजिंठा-वेरुळच्या लेणी, घृष्णेश्र्वर मंदिर ही ठिकाणे आहेत.

सज्जनगड -
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या या सज्जनगडाला महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. समर्थांनी या गडावर बराच काळ घालविला व शेवटी याच गडावर त्यांनी समाधी घेतली. इ.स. १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी गड ताब्यात घेतला. पूर्वी या गडाचे नाव परळी होते. समर्थांच्या वास्तव्यामुळे परळीचे नाव सज्जनगड झाले.

किल्ल्याला प्रमुख दोन दरवाजे आहेत. गडावर श्रीराम मंदिर, श्रीसमर्थांची समाधी, श्रीधरस्वामींची कुटी, अंगलाईचे देऊळ, त्याचबरोबर समर्थांनी वापरलेल्या काही वस्तूही गडावर पाहावयास मिळतात. गडावर गेल्यावर अगदी प्रसन्न व पवित्र वातावरण अनुभवण्यास मिळते. ‘श्रीराम नवमीचा’ उत्सव गडावर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गडावर भाविकांकरिता निवासासाठी खोल्या बांधल्या आहेत. तेथे भाविकांना भोजनाचीही सोय करण्यात येते. निसर्गाने नटलेल्या परिसरात सज्जनगड हा अधिकच उठून दिसतो. सातार्‍यापासून केवळ १२ कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे.
मुरुड- जंजिरा -
कोकणातील समुद्र किनार्‍यावरचा मजबूत, अजिंक्य व बलाढ्य जलदुर्ग म्हणून ‘मुरुड -जंजिरा’ हा ओळखला जातो. बुर्‍हानखान या हबशी सरदाराने इ. स. १५६७ ते १५७१ या काळात हा किल्ला बांधला, अशी नोंद इतिहासात आढळते. प्रथम या किल्ल्याचे नाव ‘जंझिरे-मेहरूब’ होते. ‘झंझिरा’ (अरबी शब्द) म्हणजे बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर. इ.स. १६१७ मध्ये सिद्धी घराण्याचा मूळ पुरुष सिद्धी अंबर याने मुरुड-जंजिरा येथील जहागिरी मिळवली. पुढील सुमारे ३२५ वर्षे हा किल्ला सिद्धी घराण्याच्या ताब्यातच होता. चहुबाजुंनी पाणी असलेला हा किल्ला वास्तूशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, नाना फडणीस, इत्यादींनी हा जलदुर्ग जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्या सर्वांना अपयश आले. हा किल्ला शेवटपर्यंत सिद्दींच्याच ताब्यात राहिला.

किल्ल्यामध्ये अनेक प्राण्यांची चित्रे कोरली आहेत. अरबी लिपीतील शिलालेख, ‘पंचायतन पीर’, बालेकिल्ल्यावरील वाडा, व अनेक तोफा तसेच अनेक ऐतिहासिक वास्तू किल्ल्यावर पाहावयास मिळतात. या किल्ल्यावरून संभाजीराजांनी बांधलेला पद्यदुर्ग किल्ला दिसतो. किल्ल्यात जाण्यासाठी होडीचा वापर केला जातो. ४५० वर्षानंतरही ह्या किल्ल्याची स्थिती अगदी मजबूत आहे. जवळच मुरुड या गावी नवाबाचा प्रचंड वाडा आहे. रायगड जिल्ह्यातील हा जलदुर्ग अलिबागपासून सुमारे ४५ कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्यात लोकवस्ती नाही. पण मुरुडला निवासाची सोय आहे.

लोहगड
-
पुण्यापासून जवळच असलेला लोहगड हा किल्ला अनेक पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. लोहगड हा भक्कम किल्ला आहे. गडाची उंची समुद्रसपाटीपासून साधारणत: १०२४ मी. आहे. गडावर प्रसन्न वातावरण आहे. गडावर असणार्‍या दाट जंगलामुळे येथील वातावरण खूपच थंड असते.

गडाची रचना ही प्राचीन असावी असे वाटते. इ.स. १६४८ मध्ये शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला. पण पुरंदरच्या तहाच्या वेळी हा किल्ला परत मोगलांकडे गेला. शेवटी १६७० मध्ये हा किल्ला पुन्हा मराठ्यांनी जिंकला.

लोहगडावर अनेक ऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत. तसेच गडावरून अनेक निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यास मिळतात. गडाच्या पायथ्याशीच प्रसिद्ध अशा कार्ले लेणी आहेत. मळवली स्टेशनपासून विसापूर व लोहगड हे दोन किल्ले दिसतात. राजा रविवर्मांनी सुरू केलेली भारतातील पहिली ‘लिथोप्रेस’ ही गडापासून जवळच आहे. कार्ला येथे पर्यटक निवास आहे.

शनिवारवाडा -
पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेला शनिवारवाडा हे पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. एके काळी संपूर्ण भारतातील राजकारणाचे केंद्र म्हणजे ही वास्तू होती. पहिले बाजीराव पेशवे यांनी १० जानेवारी, १७३० साली वाड्याची पायाभरणी केली. बाजीरावांच्या उत्तराधिकार्‍यांनी वाड्याचे बुरुज व दरवाजे बांधले, वाड्याचे बांधकाम पूर्ण केले. वाड्यात दिल्ली दरवाजा, खिडकी दरवाजा, नारायण दरवाजा इ. महत्त्वाचे दरवाजे आहेत. आरसे महाल, श्रीमंत पेशव्यांची बैठक, पाण्याचा हौद, सदाशिव भाऊंचे निवासस्थान, हजारी कारंजे, दिवाणखाना, पागा कार्यालय, रंगमहाल आदींचे अवशेष, इमारतींचे जोते (पायाची रचना) आज पाहण्यास मिळतात. वाड्यात असणार्‍या रंग महालाच्या काही खांबांवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे.

वाड्यात एक सात मजली, सात खणी इमारत होती. परंतु २७ फेब्रुवारी, १८२८ साली वाड्याला भीषण आग लागली व यात या सर्व वास्तू जळून खाक झाल्या. ही आग सतत सात दिवसांपर्यंत चालू होती. असे म्हणतात की, वाड्यात असणार्‍या सात मजली इमारतीच्या छतावरून आळंदीच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा कळस दिसत असे. १७५८ मध्ये या वाड्यात सुमारे १०० लोक राहत होते. थोरल्या बाजीरावांपासून नाना फडणवीसांपर्यंत अनेक राज्यकर्त्यांचा अनुभव या वाड्याने घेतला. नोव्हेंबर, १८१७ मध्ये शनिवारवाडा इंग्रजांच्या ताब्यात गेला.

सध्या वाड्यात मुख्य दरवाजा व बुरुजांच्या भिंती अस्तित्वात आहेत. वाड्याच्या आतमध्ये गतकालीन वैभवाचे अतिशय कमी अवशेष आहेत. शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाज्याबाहेर, समोर बाजीराव पेशव्यांचा भव्य पुतळा आहे. स्वातंत्र्य चळवळ, पुण्यातील समाजसुधारणा चळवळ व संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अशा अनेक चळवळींचा शनिवारवाडा अतिशय जवळचा साक्षीदार आहे.

No comments: