आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Wednesday 28 November 2012

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे -1

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे -

महाबळेश्वर -
सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ४५०० फूट उंचीवरील थंड हवेचे हे ठिकाण म्हणजे आरोग्य रक्षणाची इंग्रजांची सोय असलेले ठिकाण होते.

सातार्‍याचे महाराज प्रतापसिंह यांनी १८१८ ते १८३० दरम्यान महाबळेश्र्वर हे आरोग्यवृद्धीसाठी विकसित करण्याचे ठरवले. जॉन माल्कम हे तेव्हाचे गव्हर्नर १८२८ मध्ये महाबळेश्वरला भेट देऊन गेले. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी लॉडविक यांनी या स्थानाचा ‘थंड हवेचे ठिकाण’ म्हणून नियोजित विकास केला. त्याआधी सर चार्लस्, मॅलेट हेदेखील महाबळेश्र्वरला येऊन गेले होते असे उल्लेख आढळतात.

महाबळेश्वर पाहताना बॉम्बे पॉइंट, ऑर्थर सीट, केटस् पॉईंट, लॉडविक - विल्सन, एलफिस्टन पॉईंट्स, वेण्णा लेक, लिंगमळा धबधबा, तापोळा, जवळचे श्रीक्षेत्र महाबळेश्वर, येथील महादेवाचे मंदिर ही ठिकाणे महत्त्वाची! श्री क्षेत्र महाबळेश्वर येथूनच कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्या उगम पावतात. या स्थानाला पंचगंगा असेही म्हटले जाते.

उत्तम रस्ते, दाट झाडी, बागा, फुला-फळांच्या रोपवाटिका यामुळे महाबळेश्र्वर अनेकांचे आवडीचे थंड हवेचे ठिकाण आहे. जॅम-जेली, सरबते, मध, चणे, स्ट्रॉबेरी यांसाठीही महाबळेश्र्वर प्रसिद्ध आहे. राहण्याच्या सोयी, विविध प्रकारच्या- स्तरांच्या हॉटेल्सची मुबलक सोय यामुळे उन्हाळ्यात आणि सुट्टीत महाबळेश्वर गजबजून जाते.

इ. स. १८३४ ते १८६४ या दरम्यान महाबळेश्वरमध्ये चीनी-मलाई कैदी तुरुंग होता. सुमारे १२० कैद्यांसाठीचा तुरुंग येथे होता. स्ट्रॉबेरी लागवड, बांबूचे विणकाम, मुळ्याची - गाजराची लागवड अशी कामे कैद्यांकडून करून घेतली जात. कैदी कधी कधी तुरुंगातून सुटल्यावर परत न जाता महाबळेश्र्वर मध्येच राहू लागले, असेही झाले.

उंच कडे, खोल दर्‍या, दाट जंगले, थंड-स्वच्छ हवा आणि नीरव शांतता यांचा सुंदर अनुभव सह्याद्रीच्या रांगेतील या स्थानामध्ये मिळतो. परिसरातल्या एका गावाचे ग्रामदैवत महाबळी आहे. या महाबळीचे मंदिर यादवकाळात यादव राजांनी बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याची नोंद इतिहासात आढळते. या ग्रामदैवतावरूनच या भागाला महाबळेश्वर असे नाव देण्यात आले, असे म्हटले जाते. अनेक वैशिष्ट्यांमुळे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील पर्यटक महाबळेश्वरला वारंवार भेट देतात.
पाचगणी -
पाच डोंगरांवर वसलेले म्हणून पाचगणी असे नाव असलेले हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात (महाबळेश्र्वरपासून केवळ २० कि. मी. अंतरावर) आहे. हे ठिकाण सुमारे १३७२ मीटर उंचीवर आहे. पाचगणी आणि महाबळेश्र्वर ही दोन्ही ठिकाणे अनेक प्रेक्षणीय दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत. डोंगरकडे, दाट झाडी, चिंचोळे मार्ग, पर्यटनाचे ठिकाण म्हणून मुद्दाम तयार केलेले उत्तर रस्ते हे पाचगणीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

स्ट्रॉबेरी, तुती, केशरी गाजरे, मध, या सोबतच जॅम - जेली, सरबते तयार करणार्‍या कंपनीच्या उत्तम बागा हेदेखील पाचगणीचे आकर्षण आहे. रोपवाटिकांमधून मिळणार्‍या विविध फुला-फळांच्या रोपांची रेलचेल, यामुळे पाचगणीच्या निसर्गरम्य वातावरणात भर पडली आहे.

अनेक निवासी शाळा पाचगणीमध्ये गेली बरीच वर्षे कार्यरत आहेत.

महाबळेश्र्वर - पाचगणी जवळच छत्रपती शिवाजी महाराज - अफजलखान यांची भेट झाली. या भेटीत महाराजांनी खानाला यमसदनास पाठवले. त्या ऐतिहासिक प्रसंगाची साक्ष देणारा प्रतापगड आजही दिमाखाने उभा आहे. सातारा जिल्ह्यातच येथून जवळच सज्जनगड हा समर्थ रामदास स्वामींचे समाधिस्थान असलेला गड आहे.
लोणावळा - खंडाळा -
पुणे जिल्ह्यात अनेक प्रेक्षणीय ठिकाणे, ऐतिहासिक महत्त्वाची स्थळे आहेत. थंड हवेच्या ठिकाणांत विशेष प्रसिद्ध असलेले लोणावळा - खंडाळा हे एक ठिकाण आहे. सुमारे ६२५ मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण पावसाळ्यात धबधब्यांमुळे अधिकच आकर्षक वाटते. लोणावळा व खंडाळा ही परस्परांच्या जवळ असलेली गावे आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुणे व मुंबई या दोन महानगरांच्या मध्ये ही ठिकाणे आहेत. पुणे-मुंबई महामार्ग (रस्ता) व पुणे-मुंबई लोहमार्ग या दोन्ही मार्गांवर ही ठिकाणे आहेत. अतिशय सोयीचा प्रवास, निसर्गरम्यता, अनेक सोयी सुविधा, गर्दी व अशांततेपासून सुटकेची खात्री यांमुळे पुण्या-मुंबईतील पर्यटकांबरोबरच संपूर्ण भारतातील पर्यटक येथे गर्दी करतात.

पावसाळ्यात हौशी पर्यटक लोणावळा-खंडाळा भागात पावसात भिजत, चालत फिरतात. कार्ल्याची व भाजे येथील लेणी, एकवीरा देवीचे स्थान, राजमाची व लोहगड किल्ले ही ठिकाणेही येथून जवळ आहेत. तसेच भुशी धरण, वळवण धरण ही धरणेसुद्धा येथून जवळ आहेत.
माथेरान -
रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात सह्याद्रीच्या पश्र्चिम घाटात ८०० मी. उंचीवर हे थंड हवेचे ठिकाण आहे. दाट जंगले, डोंगर-दर्‍या, वळणा-वळणांचे घाटांचे रस्ते यांबरोबरच येथील अनेक ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. वाहनांना प्रवेश नसल्यामुळे माथेरानमध्ये चालत, घोड्यावरून किंवा डोलीतून भटकंती करावी लागते. प्रदूषणापासूनची मुक्ती अनुभवण्यासाठी आणि खरोखरच निसर्गाशी मैत्री करण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे.

लाल माती, नागमोडी रस्ते, टेकड्या, धबधबे, पठार, मोठेच्या मोठे गोल्फ कोर्स आणि नेरळ-माथेरान नॅरोगेज रेल्वे अशी येथील अनेक ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. येथे एकूण २५ ठिकाणे (पाईंट्स) पाहण्यासारखी आहेत. माथेरानला येताना पुणे-मुंबई महामार्गावरून, कर्जतकडून येताना आपण सुंदर प्रवासाचाही आनंद लुटू शकतो.

येथे पर्यटकांच्या निवासाची सोय आहे आणि वेगवेगळ्या स्तरांतील भरपूर हॉटेल्स आहेत.

ब्रिटिशांनी माथेरान ही मुंबईजवळची जागा थंड हवेचे ठिकाण म्हणून हवाबदलासाठी मुद्दाम विकसित केली. इ. स. १८५० मध्ये लॉर्ड एलफिन्स्टन (मुंबई गव्हर्नर) व ह्यूज मॅलेट (ठाणे कलेक्टर) यांनी माथेरान शोधले. या अवघड ठिकाणी रस्त्याची सोय करणेही जिकिरीचे काम होते. पण त्यातही रेल्वेची सोय करणे आश्चर्यकारक आहे. १८५४ मध्ये मुंबई गव्हर्नरने बंगला बांधल्याने माथेरानचे महत्त्व वाढत गेले.

जून ते सप्टेंबर या काळात भरपूर पाऊस असल्याने रेल्वे बंद असते. ऑक्टोबर ते डिसेंबर आणि मार्च ते मे या कालावधीत सतत पर्यटकांची वर्दळ सुरूच असते. कातकरी, ठाकर, धनगर यांची वस्ती असलेल्या या गावात ९० वर्षांची परंपरा असलेली नगरपालिका आहे.

माथेरान हे प्रामुख्याने मुंबईकरांचे लाडके ठिकाण आहे. पर्यटन आणि हवाबदल या उद्देशाने येणार्‍या पर्यटकांच्या सहली, अविस्मरणीय आठवणी येथून जाताना बरोबर घेऊन जातात हे मात्र निश्चित!

तत्कालीन उद्योजक सर आदमजी पीरभॉय व त्यांचे पुत्र अब्दुल हुसेन पीरभॉय या पितापुत्रांचाही माथेरानच्या उभारणीमध्ये मोठा वाटा आहे. सर आदमजी यांनी माथेरानच्या विकासासाठी आपली सुमारे ५० एकर जमीन उपलब्ध करून दिली. या पितापुत्रांनी माथेरान स्टीम लाईट ट्राम वे ही कंपनी स्थापन केली व त्या माध्यमातून टॉयट्रेन सुरू केली. अब्दुल हुसेन यांच्या पुढाकाराने सुरू झालेला प्रकल्प केवळ दीड वर्षात पूर्ण झाला, यासाठी त्याकाळी सुमारे १६ लाख रुपये खर्च आला होता. १९०७ मध्ये ही रेल्वे ट्रॅकवर धावू लागली. माथेरानमध्ये विजेचे दिवेही पीरभॉय यांनीच लावले. पीरभॉय पितापुत्रांमुळेच माथेरानचा प्रवास सोपा झाला व एकूण विकास झाला.
तोरणमाळ -
नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात सातपुडा पर्वताच्या रांगांत सुमारे ११४३ मीटर उंचीवर थंड हवेचे ठिकाण आहे, ते तोरणमाळ म्हणून प्रसिद्ध आहे. आदिवासी जमातीचे लोक बहुसंख्येने राहत असलेल्या अक्राणी तालुक्यात हे हिरवेगार असे ठिकाण आहे. पूर्वीच्या मांडू घराण्याच्या राजांचे हे राजधानीचे ठिकाण. महाराष्ट्रातले पर्यटक हळूहळू वेगवेगळ्या ठिकाणांकडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे राज्याच्या उत्तरेकडील भागात असलेल्या तोरणमाळमध्येही अलीकडच्या काळात गर्दी वाढते आहे. (नंदुरबार जिल्ह्याच्या माहितीमध्ये या स्थानाविषयी तपशीलवार माहिती दिलेली आहे.)
चिखलदरा -
सातपुडा पर्वतराजीतील अमरावती जिल्ह्यातील हे एक सुमारे १११८ मीटर उंचीवरचे थंड हवेचे ठिकाण आहे. महाभारतातील पांडव हे या विभागात वास्तव्याला होते. भीमाने कीचकाचा वध केला आणि येथील दरीत फेकून दिले. तेव्हा या भागाचे नाव किचकदरा आणि नंतर (अपभ्रंशाने) चिखलदरा असे झाले. महाराष्ट्रात चिखलदर्‍याच्या आसपास कॉफीचे उत्पादन घेतले जाते. येथून जवळच मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प असलेले अभयारण्य व गाविलगडचा किल्ला आहे. साग, बांबू, मोह यासारखी भरपूर झाडे असलेले दाट जंगल आणि घाटांच्या नागमोडी वळणांचा रस्ता असलेले हे जंगल मध्य प्रदेशच्या सीमेलगतच आहे.

या ठिकाणी कोरकू, गोंड, माडिया इत्यादी जमातींचे लोक मोठ्या संख्येने राहतात. भीमकुंड, आदिवासी वस्तु संग्रहालय, शक्कर तलाव, शिवमंदिर या प्रेक्षणीय ठिकाणांचा, तसेच येथील आदिवासी संस्कृतीचा, त्यांच्या विशिष्ट उत्सवांचा आनंद पर्यटक घेऊ शकतात. हे विदर्भातील दुर्मीळ गिरीस्थान आहे, याला ‘विदर्भाचे नंदनवन’ म्हणतात.
आंबोली -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे. सावंतवाडी तालुक्यामधील हिरण्यकेशी नदीच्या उगमाचे आंबोली हे स्थान सह्याद्रीच्या रांगांमध्ये आहे. डोंगर-दर्‍या, जंगल, धबधबे, समुद्र दिसण्याचे उंच ठिकाण यांचा आनंद आपण येथे घेऊ शकतो.

सुमारे ७०० मीटर उंचीवरील आंबोली येथे महादेवगड पॉईंट, मलईचे जंगल, सनसेट पॉईंट, शिरगावकर - परीक्षित पॉईंट्स, कावळे प्रसादचा कडा, नारायण गड, महादेव गड, नांगरकासा धबधबा - अशी अनेक ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. येथील अनेक ठिकाणांहून सूर्यास्ताचा मनसोक्त आनंद आपण घेऊ शकतो.
भंडारदरा -
अहमदनगर जिल्ह्यात, अकोले तालुक्यात प्रवरा नदीच्या परिसरात हे निसर्गरम्य ठिकाण आहे.

प्रवरा नदीचा उगम, भंडारदरा धरण, ऑर्थर तलाव, रंधा धबधबा, अंबरेला धबधबा, अगस्ती ऋषींचा आश्रम, अनेक नैसर्गिक धबधबे - अशी अनेक ठिकाणे येथे पाहण्यासारखी आहेत. ‘कळसूबाई’ हे राज्यातील सर्वांत उंच शिखर याच डोंगररांगेत आहे. प्रवरेवरील भंडारदारा हे धरण भारतातील सर्वांत उंचावरील धरणांपैकी एक असून, देशातील सर्वांत जुन्या (१९१०) धरणांपैकीही एक आहे.
जव्हार -
हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. भौगोलिकदृष्ट्या जव्हार कोकणात असूनही, उंचावरील स्थान असल्यामुळे येथील हवा दमट नसून थंड व आल्हाददायक आहे. येथील डोंगर-दर्‍या, नैसर्गिक धबधबे, जुना (पण सुस्थितीत असलेला) राजवाडा, सूर्यास्त अनुभवण्याचे स्थान (सनसेट पॉईंट) - अशी अनेक ठिकाणे पाहण्यास मिळतात. आदिवासी बहुल असलेल्या या भागात आपण आदिवासी संस्कृतीचा अनुभव घेऊ शकतो. आदिवासींचे ‘तारपा नृत्य’ व जगप्रसिद्ध अशी ‘वारली चित्रकला’ या कलांचे जतन प्रामु‘याने या तालुक्यात केले जाते. या कलांचाही आस्वाद आपण घेऊ शकतो. जव्हारला येथील हवामानामुळे यथार्थतेने ‘ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर’ म्हटले जाते.
कोयनानगर -
सातारा जिल्ह्यात असलेल्या या ठिकाणी कोयना धरण आणि शिवाजीसागर जलाशय आहे. कृष्णा-कोयना या मोठ्या नद्या कर्‍हाडजवळ परस्परांना मिळतात. कोयना धरणामुळे वीजनिर्मितीचे काम गेली ४० वर्षे होत आहे. जलाशयाखालून चार कि. मी. चा बोगदा तयार करून त्यातून पाण्याचा प्रवाह नेऊन वीज निर्मिती केली जाते. विस्तीर्ण जलाशय, नेहरू स्मारक उद्यान, आसपास हिरवीगार दाट झाडी यामुळे हा परिसर अतिशय आकर्षक झाला आहे. कासपठार, ठोसेघर धबधबा अशी जवळची ठिकाणे सहलींसाठी प्रसिद्ध आहेत.

No comments: