महाराष्ट्रातील किल्ले
‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’
या शब्दांत सह्याद्रीच्या डोंगर-दर्यात वसलेल्या महाराष्ट्राचे यथार्थ वर्णन गोविंदाग्रजांनी केलेले आहे. आहे.
महाराष्ट्राला सह्याद्रीच्या रांगांमध्ये घनदाट जंगलांची निसर्गसंपत्ती लाभलेली आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास ह्या दर्या-खोर्यांशी, डोंगरांशी जोडलेला आहे. या डोंगर रांगांतील किल्ले हा इतिहास आपणासमोर आजही बोलका करतात. या किल्ल्यांवरच इतिहास जन्माला आला आणि यांच्या साहाय्याने स्वराज्य स्थापन झाले. हे किल्ले इतिहासाची साक्ष तर देताताच तसेच गिर्यारोहण व पर्यटन यादृष्टीनेही हे किल्ले महत्त्वपूर्ण आहेत.
महाराष्ट्रातील काही प्रमुख किल्ल्यांविषयीची माहिती पुढीलप्रमाणे -
महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांची सूची
| जिल्हा | किल्ल्याचे नाव |
| रायगड | रायगड, कर्नाळा, लिंगाणा, द्रोणागिरी, सुधागड, अवचितगड, सरसगड, तळे, घोसाळे इत्यादी. तसेच सागरी किल्ल्यांमध्ये खांदेरी-उंदेरी, कासा व मुरुड-जंजिरा |
| पुणे | सिंहगड, पुरंदर, शिवनेरी, राजगड, तोरणा, लोहगड इत्यादी |
| सातारा | प्रतापगड, सज्जनगड, कमळगड, मकरंदगड, वसंतगड, केंजळगड, अजिंक्यतारा इत्यादी. |
| कोल्हापूर | पन्हाळा, विशाळगड, गगनगड, भूदरगड इत्यादी. |
| ठाणे | वसईचा भुईकोट किल्ला, अर्नाळा (सागरी), गोरखगड इत्यादी. |
| सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग व विजयदुर्ग (सागरी), देवगड इत्यादी. |
| रत्नागिरी | सुवर्णदुर्ग (सागरी), रत्नगड, जयगड, प्रचितगड इत्यादी. |
| अहमदनगर | हरिश्चंद्रगड, रतनगड व अहमदनगरचा भुईकोट किल्ला. |
| औरंगाबाद | देवगिरी (दौलताबाद) किल्ला. |
| नाशिक | ब्रह्मगिरी, साल्हेर - मुल्हेर इत्यादी. |
वरीलपैकी काही वैशिष्ट्यपूर्ण किल्ल्यांची तपशीलवार माहिती पुढे देत आहोत.
रायगड -
‘रायगड’ हा शिवकालातील महत्त्वपूर्ण किल्ला होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६४ मध्ये हा गड बांधून घेतला. शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड! छत्रपती शिवाजी महाराज यांचा शके १५९७, आनंदनाम संवत्सर, जेष्ठ शु. त्रयोदशी, शनिवार (६ जून, १६७४) रोजी जो राज्याभिषेक झाला, तो याच रायगडावर. छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसन रायगडावरच झाले. म्हणून या गडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रायगड (कुलाबा) जिल्ह्यातील महाड तालुक्यात असणार्या या गडाच्या सभोवताली दाट जंगले आहेत. त्यामुळे लांबून गडाचे दर्शन अतिशय विलोभनीय दिसते.
छत्रपती शिवाजी राजांची समाधी रायगडावर असून गडावर अनेक इतर ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यात विशेष करून महाराजांची सदर, दरबाराची जागा, हिरकणी बुरूज, भवानी टोक, छत्रपतींच्या वाड्याचा चौथरा, बाजारपेठेचे अवशेष इ. महत्त्वाच्या वास्तू आहेत. गडाला सुमारे १४०० पायर्या आहेत. ज्या शिवभक्तांना गडावर चालत जाणे शक्य नाही, अशांसाठी आता ‘रायगडावर’ रोपवेची सोय करण्यात आली आहे. गडावर राहण्याची व भोजनाची उत्तम प्रकारे सोय आहे. गडाच्या पायथ्याशी पाचडला मातोश्री जिजाबाईंची समाधी आहे. महाडपासून २७ कि. मी. अंतरावर असणार्या रायगडावर जाण्यासाठी महाडपासून गाड्यांची सोय आहे. श्रेष्ठ समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी शिवरायांच्या समाधीचा जिर्णोद्धार केला, तसेच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाची येथूनच सुरुवात केली.
राजगड -
गडांचा राजा म्हणजे ‘राजगड’ होय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला म्हणजे ‘राजगड’. स्वत: महाराजांनी या गडाची उभारणी केली असून इ. स. १६४५ ते १६७२ जवळजवळ २७ वर्षांचा कालखंड महाराजांनी गडावर घालविला होता. महाराजांची काही काळासाठी ‘राजगड’ ही राजधानी होती.
अतिशय दुर्गम किल्ला म्हणून आजही जागतिक स्तरावर ‘राजगडचा’ गौरव केला जातो. गडावर, संजीवनी माची, बालेकिल्ला, पद्मावती देऊळ, राजवाडा, मारुती मंदिर आदी महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत. गडावरून निसर्गाच्या अकराळ-विकराळ पण तरीही सुंदर अशा स्वरूपाचे दर्शन होते. अतिशय देखणा पण चढण्यास अवघड असा हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजीराजांनी मिर्झाराजे जयसिंगाशी जो तह केला होता, त्यामध्ये राजांनी २३ किल्ले मुघलांच्या स्वाधीन केले होते. त्या वेळी स्वराज्यात राहिलेल्या १२ किल्ल्यापैकी एक म्हणजे ‘राजगड’ हा प्रसिद्ध किल्ला होय. पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात हा डोंगरी किल्ला असून, पुणे, भोर येथून गडावर जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत.
शिवनेरी -
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे. शिवनेरी किल्ला सुमारे १०७० मीटर उंच असून दक्षिण - उत्तर दीड किलोमीटर पसरलेला आहे. किल्ल्याचा दक्षिणेकडील भाग अर्धगोलाकृती आहे, तर उत्तरेकडे तो निमुळता होत गेला आहे.
शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला ती वास्तू, शिवाई मंदिर, हत्ती दरवाजा, शिवबाई दरवाजा, बदामी तलाव इत्यादी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. गडावरील शिवाई देवीच्या नावावरूनच जिजाऊंनी छत्रपतींचे नाव ‘शिवाजी’ ठेवले, असे म्हटले जाते. याचबरोबर गंगा-जमुना नावाच्या गार पाण्याच्या दोन मोठ्या ‘टाक्या’ आहेत. किल्ल्याच्या आसपास बौद्ध लेणी असलेल्या तीन डोंगराच्या रांगा आहेत.
अलीकडेच महाराष्ट्र शासनाने किल्ल्यावर एक भव्य मंडप बांधला असून त्यास ‘शिवकुंज’ असे नाव दिले आहे. त्यामध्ये सिंहारूढ असलेल्या ‘मातोश्री जिजाबाई’ व तलवार घेऊन बसलेले बाल शिवाजी यांची पंचधातूची सुंदर मूर्ती स्थापित केली आहे. शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून पुण्याहून ९४ कि. मी. एवढ्या अंतरावर आहे. गडावर भोजन व निवासाची व्यवस्था आहे.
सिंहगड -
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने पावन झालेला हा सिंहगड किल्ला पुण्यापासून फक्त २४ कि. मी. अंतरावर आहे. सिंहगडाचे पूर्वीचे नाव ‘कोंढाणा’ होते. इ. स. १६७० मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वत:चे बलिदान देऊन हा किल्ला स्वराज्यात दाखल केला. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजीबद्दल ‘गड आला पण सिंह गेला’ असे उद्गार काढले. तेव्हापासून कोंढाण्याचे नाव सिंहगड झाले.
समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० मी. उंचीवर हा किल्ला आहे. गडावर नरवीर तानाजींची समाधी, कल्याण दरवाजा, राजारामांची समाधी, अमृतेश्वर मंदिर इ. महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू आहेत. त्याचबरोबर लोकमान्य टिळकांचा बंगलाही गडावर आहे. पेशवाईच्या काळात कैद्यांना ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग केला जात असे. लोकमान्य टिळक चिंतन-मनन, अभ्यास व लेखनासाठी, तसेच विश्रांतीसाठी सिंहगडावर वारंवार येत असत. शिवकाळ - पेशवाई - स्वातंत्र्य लढा या तिन्ही काळात हा महत्त्वाचा होता. गडावरून खडकवासला धरण, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीचे) दृश्य पाहावयास मिळते. पुणे शहराच्या अगदी जवळ असा हा किल्ला असल्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
प्रतापगड -
शाहीर तुळशीदास यांनी म्हटल्याप्रमाणे ‘राजगड राजाचा, प्रतापगड जिजाईचा!’ राजमाता जिजाबाईंचा सर्वांत आवडता किल्ला म्हणजे प्रतापगड. प्रतापगडाचे बांधकाम इ.स. १६५६ ते १६५८ या २ वर्षाच्या कालावधीत पूर्ण झाले. मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली हा गड बांधला गेला. सह्याद्री पर्वत रांगेत व जावळीच्या खोर्यात घाटमाथ्यावरती हा गड आहे. आजुबाजुला घनदाट जंगल आहे.
स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध महाराजांनी याच ठिकाणी केला. या वेळी झालेल्या घनघोर लढाईत, खानाच्या प्रचंड सेनेचा सामना करताना महाराजांनी गनिमी कावा तंत्राचा अतिशय हुशारीने वापर केला. प्रतापगडावर अनेक शिवकालीन मंदिरे आहेत. भवानी मातेचे मंदिर, छत्रपतींचा पुतळा ही स्थाने या ठिकाणी आहेत. जवळच महाबळेश्र्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रतापगड हा सातारा जिल्ह्यात असून पुण्यापासून १३७ कि. मी. अंतरावर आहे. पुण्याहून बसेसची सोय आहे. गडाच्या पायथ्याशी जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था आहे.
पुरंदर -
पुरंदर पाहिला की, काही गोष्टी डोळ्यासमोर येतात. धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्म, सवाई माधवराव यांचा जन्म, दिलेरखानानी किल्ल्याभोवती दिलेला वेढा, मुरारबाजींची शर्थीची लढाई इ. प्रसंग आठवतात. गडाची उंची समुद्रसपाटीपासून साधारण १४०० मी. इतकी आहे. १६६५ साली दिलेरखानानी किल्ल्याला वेढा दिला होता. त्या वेळी केवळ ७०० मावळे हाताशी घेऊन मुरारबाजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून स्वराज्यासाठी बलिदान दिले. पुरंदर ही अगदी सुरुवातीच्या काळात पेशव्यांची राजधानी होती.
पुरंदर गडावर केदारेश्वर, रामेश्वर, पेशव्यांचा वाडा, खांदकडा इ. ऐतिहासिक वास्तू आहेत. तसेच गडावरील शेंड्या बुरूज, हत्ती बुरूज, मुरवी तलाव, राजाळे तलाव, मुरारबाजीचा पुतळा ही स्थानेही इतिहास जिवंत करतात. पुरंदर गडावरून आजुबाजुला नजर टाकली की, वज्रगड, सिंहगड, राजगड, विचित्रगड या किल्ल्यांचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळते.
सध्या पुरंदर हा किल्ला राष्ट्रीय छात्रसेना प्रबोधिनीच्या ताब्यात असून तेथे प्रशिक्षण कार्यक्रम होतात. नीरा व कर्हा या नद्यांच्या मध्ये वसलेल्या पुरंदर किल्ल्याला जाण्यासाठी पुण्याहून एस.टी. ची सोय आहे. पुण्यापासून ३८ कि. मी. अंतरावर सासवड (पुरंदर) तालुक्यात हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी केतकावळे या गावी `प्रतिबालाजी' हे सुंदर मंदिर आहे.
सिंधुदुर्ग -
मुरुड-जंजिर्याच्या विजयाचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या शेजारी भव्य व अजिंक्य जलदुर्ग बांधला तोच सिंधुदुर्ग होय. १६६४ ते १६६७ च्या दरम्यान हा किल्ला बांधण्यात आला. ४८ एकराचा किल्ल्याचा परिसर असून, किल्ल्याला ४२ बुरुज आहेत. मोठे दगड व सुमारे ७२,५७६ कि. गॅ. लोखंड वापरून याच्या भिंती बांधल्या आहेत. मराठ्यांचा हा महत्त्वपूर्ण किल्ला होय. किल्ल्याच्या बांधकामासाठी गोव्याहून अनेक पोर्तुगीज तज्ज्ञांना बोलावण्यात आले होते. सुमारे ३०० कामगार यासाठी सतत ३ वर्षे अहोरात्र झटत होते. किल्ला बांधण्यासाठी प्रचंड खर्च करण्यात आला होता.
किल्ल्याच्या चारही बाजूंनी समुद्र असल्यामुळे किल्ला अगदी उठून दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे, आणि छत्रपतींचे मंदिर ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत. किल्ल्यात महाराजांचा वाडा, ध्वजस्तंभ, मारुती व भवानी मंदिर इ. महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे आहेत. किल्ल्यात जाण्यासाठी मालवणहून बोटीच्या साहाय्याने जाता येते.
पन्हाळा -
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा हा शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांपैकी महत्त्वपूर्ण किल्ला. महाराजांनी इ. स. १६५९ रोजी हा किल्ला जिंकला. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून महाराज मोजक्या सहकार्यांबरोबर बाहेर पडून पन्हाळ्याहून विशाळगडावर पोहोचले. या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार - पन्हाळा!
पन्हाळ्याची उंची साधारणत: ८५० मी. आहे व घेर ८-९ कि. मी. आहे. वाघ दरवाजा, तीन दरवाजा, चार दरवाजा असे दरवाजे गडावर आहेत. गडावर मोठमोठी धान्याची कोठारे आहेत. त्यात गंगा व सज्जा कोठी ही महत्त्वाची धान्याची कोठारे आहेत. कविवर्य मोरोपंताचे जन्मस्थान, रामचंद्रपंत अमात्यांची समाधी, बाजीप्रभू देशपांडे यांचा भव्य पुतळा तसेच शिवा काशीद यांचाही पुतळा इत्यादी महत्त्वाची ठिकाणे गडावर आहेत. पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेवापूर येथे शिवा काशीद यांची समाधी आहे. छत्रपतींना सिद्धीच्या वेढ्यातून सोडवताना शिवा काशीद यांनी दिलेले बलिदान तसेच महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत बाजीप्रभूंनी केलेली पराक्रमाची शर्थ हा इतिहास महाराष्ट्राला ज्ञात आहेच. महाराणी ताराबाई यांनी काही काळ कोल्हापूर गादीची राजधानी म्हणून पन्हाळा येथून कारभार पाहिला.
कोल्हापूर शहरापासून २० कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. जवळच जोतिबाचे मंदिर (जोतिबाचा डोंगर) आहे. निसर्गसंपन्नतेने नटलेल्या या किल्ल्यावर अगदी शेवटच्या टोकापर्यंत गाडी जाते. किल्ल्यावर राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. अनेक हॉटेल्स, लॉजेस गडावर आहेत. गडावर जणू एक गावच वसलेले आहे. विशेष बाब म्हणून शासनाने येथे गिरीस्थान नगरपरिषद स्थापन केलेली आहे.