आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Thursday 21 July 2016

कांचनसंध्या- कवी बा.भ.बोरकर

कांचनसंध्या
कवी बा.भ.बोरकर यांची ही एक अतिशय सुंदर कविता. आपलं वय जसं वाढत जातं, तसं तसं आपण matured होत जातो, असं म्हणतात. म्हणजे, डोक्यावरचे केस कमी व्हायला लागतात, हातापायांचे सांधे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला लागतात, आणि इतरांकडून आपल्या अपेक्षा वाढू लागतात!
मोरोपंत म्हणतात, तशी कृतांतकटकामलध्वजजरा दिसायला लागली, तरी सुखसमाधान आणि कृतार्थता या भावनां ऐवजी वैफल्य आणि कडवटपणा येण्याचा संभव जास्त !!

आयुष्याच्या संध्याकाळी, जेव्हा मुलं-बाळं मार्गी लागलेली असतात, जगाचे भले बुरे अनुभव घेऊन झालेले असतात, त्यावेळी उदासी येण्याऐवजी आयुष्याकडे सकारात्मक कसे बघावे हे ही बाकीबाब यांची कविता शिकवून जाते…..

👇

पिलांस फुटुनी पंख तयांची
घरटी झाली कुठे कुठे,

आता आपुली कांचनसंध्या
मेघडंबरी सोनपुटें.

कशास नसत्या चिंता-खंती
वेचू पळती सौम्य उन्हे,

तिमिर दाटता बनुनि चांदणें
तीच उमलतील संथपणे.

सले कालचीं विसरून सगळी
भले जमेचें जिवीं स्मरूं,

शिशुहृदयाने पुन्हा एकदा
या जगतावर प्रेम करूं.

उभ्या जगाचे अश्रु पुसाया
जरी आपुले हात उणे

तरी समुद्रायणी प्रमाणें
पोसूं तटिची म्लान तृणें.


इथेच अपुली तीर्थ-त्रिस्थळी
वाहे अपुल्या मुळी-तळी,

असू तिथे सखि! ओला वट मी आणिक तूं तर देव-तळी.


शिणुनी येती गुरें-पाखरें
तीच लेकरें जाण सखे,

दिवस जरेचे आले जरी
त्या काठ जरीचा लावू सुखें...!


– बा.भ. बोरकर

*******

No comments: