आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Saturday 17 December 2016

पालक आणि मुले


*1 पालकांनी पाल्याशी कसे वागावे ?*

१. पाल्यावर अधिकार गाजवू नये; तर त्याच्याशी मैत्री करावी.
२. प्रत्येक कृती करण्यास प्रेमाने सांगावे.
३. सांगतांना आपली कृती तपासावी.
४. मुलांकडून खूप अपेक्षा असतात. त्या टाळाव्यात म्हणजे मुलांनाही आणिआपल्यालाही ताण येणार नाही.
५. मुलांना पैशांपेक्षा प्रेम महत्त्वाचे आहे. हे तत्त्व नेहेमी लक्षात घ्यावे.
६. पाल्यासाठी स्वतःचा जास्तीतजास्त वेळ द्यावा.
७. मुलांच्या सर्व समस्या शांतपणे ऐकून घ्याव्यात.
८. स्वतःची चूक झाली असल्यास ती मुलांसमोर मान्य करावी.
९. प्रत्येकाची प्रकृती ही निरनिराळी असल्याने पालकांनी आपल्या मुलाची तुलना कधीहीदुसर्‍या मुलाबरोबर करू नये.
१०. मुलांसमोर त्यांच्याविषयी नकारात्मक बोलू नये. (‘तुला कळत नाही, तुला येतनाही, तुला जमणार नाही, तू कधी शांत होणार ?, याने मला खूप डोक्याला ताप दिलाआहे’, अशी नकारात्मक भाषा वापरल्याने मुलांच्या बालमनावर परिणाम होऊनत्यांच्याशी जवळीक साधता येत नाही.)
११. घरात नवीन आलेल्यांसमोर (पाहुण्यांसमोर) मुलांचे दोष सांगितले जातात. तेथे तेसांगण्याऐवजी मुलांनाच ते प्रेमाने सांगावे.
१२. आपला पाल्य काय करत नाही, हे सांगण्यापेक्षा तो काय चांगले करतो, ते इतरांनासांगावे; मात्र त्याचे अवास्तव कौतुक करू नये.
१३. मुलांकडूनही शिकण्याचा स्थितीत रहाणे.
१४. पालकांनी स्वतः देवभक्ती केली, तसेच स्वतःचे आचरण मुलांसमोर आदर्शठेवल्यास तीही त्याचे अनुकरण करतील.
१५. ‘मुलांचा पालनकर्ता मी नसून भगवंत आहे’, याची जाणीव ठेवावी. (त्यामुळे ताणयेत नाही.)
वरील पद्धतींचे आचरण केल्यास निश्चितच एक चांगली पिढी आपण राष्ट्राच्याउभारणीसाठी घडवू शकतो.

*2.मुलांना चांगल्या सवयी लागण्यासाठी त्यांच्यावर करावयाचे घरगुती मानसोपचार*

पालक, मुलांच्या समस्या
‘जग ही एक रंगभूमी आहे’, या शेक्सपियरच्या प्रसिद्ध वाक्याच्या संदर्भात एक मानसशास्त्रज्ञ म्हणतो, ‘‘घर ही एक प्राथमिक रंगभूमी आहे. तिथे कुठली भूमिका कशी करायची, ते मुले शिकतात.’’ घरातील वातावरण आणि माणसे, विशेषतः मुलाचे आई-वडीलच त्याचे मानसिक आरोग्य घडवण्यास मुख्यतः कारणीभूत असतात. एक मानसोपचार तज्ञ म्हणतात, ‘‘मुलांच्या समस्या, म्हणजेच समस्यायुक्त आई-वडील !’’ अशा वेळी मुलाच्या आई-वडिलांनाच मानसोपचाराची अधिक आवश्यकता असते. आई-वडील आणि घरातील इतर मोठी मंडळी यांची चुकीची विचारसरणी अन् वागणूक, तसेच चुकीच्या भावना यांचा परिणाम मुलाच्या मनावर कळत-नकळत सतत होत असतो. मुलावर मानसोपचार करायची पाळी येऊ नये; म्हणून प्रतिबंधक उपाय या दृष्टीने आई-वडिलांचे व्यक्तीमत्त्व चांगले असणे महत्त्वाचे असते. मुलांशी नेहमी वागतांना, तसेच मुलांच्या घरगुती मानसोपचाराच्या दृष्टीने काही नियम पाळणे आवश्यक असते.
मुलांना प्रेम आणि आधार यांची आवश्यकता असणे
मुलाच्या मनात ‘आई-वडिलांचे आपल्यावर पुष्कळ प्रेम आहे, त्यांना आपण हवे आहोत आणि त्यांचा आपल्याला आधार आहे’, अशा प्रकारच्या भावना निर्माण होतील, असे वर्तन आई-वडिलांनी ठेवले पाहिजे, उदा. अधून मधून त्याला जवळ घेणे, त्याला एकटे ठेवून फार वेळ घराबाहेर न रहाणे इत्यादी गोष्टी केल्या पाहिजेत. एकापेक्षा अधिक मुले असल्यास ‘डावे-उजवे’ असे मुळीच करू नये. दोन मुलांत ३ वर्षांपेक्षा अल्प अंतर असेल, तर मोठ्या मुलाकडे थोडेसे अधिक लक्ष द्यावे.
आई-वडिलांनी मुलांसमोर भांडल्यास त्यांना निराधार वाटणे
आई-वडिलांनी मुलांसमोर भांडू नये. लहान मुलांना ‘घरातील तंत्र बिघडले आहे’, याची लगेचच जाणीव होते आणि त्यांच्या मनात ‘आई-वडिलांचा आपल्याला आधार मिळेल कि नाही’, अशी शंका निर्माण होते.
पालकांनो, मुलांना शिस्त लावण्यासह वेळीप्रसंगी शिक्षाही करणे आवश्यक !
मुलांना प्रेमासह शिस्तही लावली पाहिजे; पण शिस्तीचा विपर्यास होऊ देऊ नये. विपर्यास झाला की, समस्या निर्माण झाल्याच, असे समजा.
चुकीची जाणीव होण्यासाठी तात्काळ शिक्षा करणे आवश्यक : मुलांच्या हातून चुकीच्या कृती घडत असतांना त्यांना त्याची जाणीव तात्काळ करून देऊन शिक्षाही करायला हवी. त्या वेळी आईने ‘थांब, संध्याकाळी बाबा घरी आल्यावर त्यांना तुझे नाव सांगते’, असे म्हणून उपयोगी नाही. बाबा घरी आल्यावर त्यांनी विलंबाने दिलेल्या शिक्षेमुळे ‘चूक म्हणजे शिक्षा’, असे समीकरण त्याच्या मनात निर्माण होत नाही आणि ते मूल तीच चूक पुनःपुन्हा करत रहाते.
शिक्षेमध्ये सातत्यही असावे : एखाद्या वेळी चुकीसंदर्भात शिक्षा करणे, तर दुसर्‍या वेळी चुकीकडे दुर्लक्ष करणे, असे करू नये.
शिक्षेमध्ये मतभेद नकोत : शिक्षेचे स्वरूप आणि ती द्यावी कि नाही, याविषयी आई-वडील अन् घरातील इतर मोठी मंडळी यांच्यामध्ये मतभेद असले, तरी एकजण शिक्षा करत असतांना इतरांनी मध्ये पडू नये. जे मतभेद असतील, ते मुलांच्या अपरोक्ष चर्चा करून सोडवावेत, अन्यथा हे मतभेद ऐकून योग्य आणि अयोग्य काय, याचा मुलांच्या मनात गोंधळ उडतो.

*3 अभ्यासाचे महत्त्व मुलांच्या मनावर कसे ठसवावे ?*

मुलांना नेहमी शास्त्रज्ञ, उद्योगपती, कुशाग्र बुद्धीमत्तेच्या प्रसिद्ध व्यक्तीच्या निवडक गोष्टी सांगाव्यात व त्याप्रमाणे या मोठ्या पदावर पोहोचण्यास त्या व्यक्तींना काय श्रम करावे लागले, किती अभ्यास करावा लागला, याची माहिती मुलांच्या मनावर परिणामकारकरीत्या रुजेल, असे पहावे. कठोर परिश्रमास पर्याय नाही याबद्दल त्यांच्या मनात संदेह राहू नये.
मुलाच्या मनावर हे बिंबवा की, स्वकर्माची फळे त्याला भोगायची असतात. आता अभ्यास केल्यास त्यालाच त्याचा पुढे सर्वांगीण फायदा होईल. कठोर, प्रामाणिक परिश्रम करणाऱ्यांच्या पाठीशी देव सदैव उभा रहातो, हे मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे.
अभ्यास सोपा करून सांगण्यासाठी वेगवेगळया साधनांची मदत घ्या !
जेवढे मूल वयाने लहान तेवढे निरनिराळया गोष्टी किंवा योग्य ती उदाहरणे देऊन विषय सोपा करून अभ्यासाविषयी आवड निर्माण करणे महत्त्वाचे असते. १० ते १२ वर्षे वयाच्या मुलांमध्ये अमूर्त कल्पनेचा विकास झालेला नसतो व त्यामुळे बीजगणितातील `क्ष’ म्हणजे नेमके काय याचे त्यांना आकलन होत नाही.
२ – ४ गोट्या, पेन्सिली किंवा लाकडी ठोकळयांचा उपयोग करणे महत्त्वाचे असते. मधून-मधून मुलाला विषयाचे आकलन होत आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. गणित, विज्ञान यांसारख्या विषयांचा पाया पक्का करणे पालकांना जमत नसेल, तर त्यासाठी अनुभवी शिक्षकाची मदत घेणे योग्य होय.
जर मूल नापास झाले असेल, तर त्याला वरच्या वर्गात ढकलण्याचा प्रयत्न करू नका. कारण जर त्याच्या अभ्यासाचा पायाच जर मुळात कच्चा राहिला असेल, तर वरच्या वर्गाच्या वाढलेल्या अभ्यासात तो आणखीनच मागे पडेल. जर मूल नापास झाले असेल, तर त्याला रागावू नका. वारंवार रागावल्याने मुलाचे अभ्यासातील लक्ष आणखीनच कमी होऊन तो अभ्यास करणे सोडून देईल. त्याला सहानुभूतीने वागवून त्याच्या नापास होण्याची कारणमीमांसा करून त्यात सुधारणा करू शकतो.
घरातील वातावरण अभ्यास करण्यास पुरक ठेवा !
चांगला अभ्यास होण्यासाठी घरातील वातावरण खेळीमेळीचे, विश्वासपूर्ण, शांत व अभ्यास करण्यास उत्तेजक असले पाहिजे. प्राचीन काळी मुलांना विद्या संपादन करण्यासाठी आश्रमांत पाठवले जात असे व असे आश्रम गावापासून दूर एकांतात, शांत, प्रसन्न वातावरणात असत. आताच्या बदललेल्या शिक्षणपद्धतीमुळे पालकांवरील जबाबदारी जास्तच वाढली आहे. म्हणून पालकांनी घरातील वातावरण शांत, खेळीमेळीचे व अभ्यासास उत्तेजन मिळेल अशा प्रकारचे ठेवण्यासाठी जागरूक असले पाहिजे.
मूल अभ्यास करत असतांना रेडिओ किंवा दूरदर्शन लावू नये. मुलांसमोर आई-वडिलांनी एकमेकांशी भांडण करू नये. तसेच हातातले काम सोडून अथवा स्वयंपाक करता करता रस्त्याने जाणारी लग्नाची वरात पहाण्यासाठी धावू नये, कारण तुमच्या पाठोपाठ तुमचे मूलही अभ्यास अर्धवट सोडून तुमच्याप्रमाणेच लग्नाची वरात पहाण्यासाठी धावेल. जर तुम्हाला स्वत:ला वरात पहाण्याचा मोह टाळता येत नसेल, तर तुमच्या मुलाने तोच मोह टाळून अभ्यास करीत बसावे, ही अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. थोडक्यात म्हणजे मुलाचा अभ्यास चांगला व्हावा, असे वाटत असेल, तर घरातले वातावरण आश्रमासारखेच व्हायला हवे.
मध्येच केव्हातरी मुलाला त्याच्या अभ्यासाविषयी विचारण्यापेक्षा दररोज थोडा वेळ त्याला शिकवावे. जर तुमचा मुलगा महाविद्यालयात जात असेल व त्याचे विषय तुम्हाला शिकवता येत नसतील, तर निदान रात्री मुलगा अभ्यास करीत असतांना मुलाबरोबर काहीतरी उपयोगी असे, उदा. गीता, ज्ञानेश्वरी, संतांची चरित्रे यांसारखे वाचन करावे व त्याची स्वत: टिपणे काढावीत. तुमच्या मुलाला किंवा मुलीला सोबत मिळेल व आई-वडीलही अभ्यास करीत आहेत, याची जाणीव त्याला होईल. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, की मुले ही अनुकरणप्रिय असतात.
एखादा परिच्छेद वाचून मग एक-दोन ओळीत त्यातील महत्त्वाचे मुद्दे लिहिण्याची सवय मुलांना लावावी व नंतर संपूर्ण धडाच संक्षिप्त करून मुख्य मुद्यांची मांडणी करावी. साधारणत: एखाद्या विषयावर मन एकाग्र करून अभ्यास सतत ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ करणे अवघड असते. त्यामुळे मुलाला थोडा वेळ मध्ये विश्रांती घेऊ द्यावी किंवा विषय बदलण्यास सांगावे.
केवळ जास्त तास अभ्यास करणे हा खरा अभ्यास नव्हे. एकाग्रतेने ३ ते ४ तास वाचन-मनन केले, तर तो खरा अभ्यास होय. काही वेळा मुलांना आवडणाऱ्या देवाचे चित्र त्याच्या अभ्यासाच्या टेबलावर ठेवल्याने मुलांत आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते. मन एकाग्र करण्यास ध्यान धारणेचाही पुष्कळ उपयोग होतो.

No comments: